बीड – महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वातावरण तापले आहे. यातच आता आणखी एका सरपंचाचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यातील परळी धर्मापुरी मार्गावरील मिरवट फाट्यावर राखीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सरपंचाचा मृत्यू झाला आहे. अभिमन्यू क्षीरसागर असे मृत सरपंच यांचे नाव आहे. ते बीड जिल्ह्यातील सौंदाना गावचे सरपंच होते.
नेमकं काय घडलं –
मिळालेल्या माहितीनुसार, सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे परळीवरून शनिवारी रात्री साडेआठ वाजता काम आटपून दुचाकीने गावाकडे निघाले होते. यावेळी मिरवट येथे त्यांच्या दुचाकीला टिप्परने धडक दिली. या धडकेत अभिमन्यू क्षीरसागर हे रस्त्याच्या कडेला जाऊन पडले. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेत त्यांचा त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, सरपंच क्षीरसागर यांच्या मृत्यूची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यानंतर सरंपच क्षीरसागर यांचा मृतदेह परळी येथील जिल्हा रुग्णालयात शवविछेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. बीडमधील राखेचे अवैध व्यवसाय होत असल्याचे आरोप होत असताना सरपंचाचा अपघाती मृत्यू झाला आहे. अभिमन्यू क्षीरसागर यांच्या अपघाती मृत्यूबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. हा टिप्पर कोणाच्या मालकीचा आहे, याचादेखील तपास पोलिसांच्या वतीने केला जात आहे.