मुंबई, 2 डिसेंबर : राज्यात महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण हे ठरले नसताना राजकीय नेत्यांच्या वक्त्यव्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी काल माध्यमांसोबत बोलताना मोठा दावा केला होता. यावर आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
गुलाबराव पाटील यांचा दावा काय? –
संजय राऊत हे जळगाव जिल्ह्यातील आमच्या पाच जागा पाडणार होते. यासाठी जळगावात दोन-दोन दिवस आले होते. खरंतर, राऊतांना उद्धव ठाकरे यांनी ओळखावे, नाहीतर आता जे निवडून आलेले 20 आमदार आहेत. ते आमच्याकडे येणाच्या तयारीत असल्याचा दावा, गुलाबराव पाटील यांनी काल जळगावात माध्यमांसोबत बोलताना केला होता.
संजय राऊत यांचे प्रत्युत्तर –
ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत हे आज सकाळी माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, गुलाबराव पाटील यांनी थोडे दिवस थांबावे अन् भाजपा तुमचा पक्ष शिल्लक ठेवतोय का? हे तुम्हाला कळेल. दरम्यान, आता आमच्याकडे जे राहिलेले आहेत ते कडवट निष्ठावंत आहेत. तुमचासारखा जो गाळ होता.. बेईमानांचा पालापाचोळा होता, तो उडून गेला. ईडी-सीबीआयने फुंकर मारली अन् त्या फुंकरबरोबर तुमच्यासारखी लोकं उडून गेले. आता जो उरलेला आहे तो निष्ठावंतांचा भक्कम मेळा आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे.
“…तर ही वेळ आली नसती” –
एकनाथ शिंदे यांनी आता मुख्यमंत्रीपदाबाबत जी लवचिकता दाखवली ते जर 2019 साली उद्धव ठाकरे यांनी दाखवले असते तर असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, आता एकनाथ शिंदे हे अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपदावर राहिलेले आहेत. तेव्हा जर ते मूळ शिवसेनेला दिले असते तर ही वेळ आली नसती. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना भाजप मुख्यमंत्रीपद देऊ शकते. ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला द्यायला तयार नव्हते. कारण, त्यांना मूळ शिवसेना नष्ट करून या राज्यात डूप्लीकेट शिवसेना उभी करायची होती, असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा : “…जुलाबराव होऊ नका”, गुलाबराव पाटील यांच्या ‘त्या’ विधानावर अमोल मिटकरी यांची खोचक प्रतिक्रिया