नवी दिल्ली – महायुतीच्या सरकारचा भव्य दिव्य आणि ऐतिहासिक शपथविधी सोहळा काल मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, एकनाथ शिंदे हे सत्तेत सहभागी होणार का की ते गृहमंत्रीपदावरुन काही दबाव टाकत आहेत, अशा अनेक चर्चा होत होत्या. अखेर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, आज यावर राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. शिंदे शपथ घेत नसतील तर शिंदेंशिवाय शपथविधी सोहळा पार पाडावा, अशा सूचना भाजप वरिष्ठांनी दिल्या होत्या, असा दावा संजय राऊत यांनी केला.
काय म्हणाले संजय राऊत –
राष्ट्रवादी आणि भाजपच्या पत्रिकेवर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा उल्लेख होता. त्यामुळे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही, याबाबत सर्वांच्या मनात संभ्रम होता. सर्वांना याबाबतची उत्सुकता होती. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, सरकारमध्ये आमची माणसे आहेत आणि त्यांच्या पक्षातही आहेत. पण शिंदेंकडून दबाव दाखवला गेला असता तर त्यांच्याशिवाय पुढे जा, असं भाजपच्या वरिष्ठांनी खाली कळवले असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. तसेच अद्यापही सारे काही ठिक नाही. राज्याला पूर्ण मंत्रिमंडळ मिळाले नाही. याआधी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. अशा घटना घडलेल्या आहेत.
जनतेने हा निर्णय दिला आहे. तो निर्णय आम्हाला मान्य नसला तरी त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आमच्यावर जबाबदारी दिली आहे. ती आम्ही पार पाडू. आम्ही हारलो. लोकांनी आम्हाला मते दिली नाही, असं ईव्हीएमच्या माध्यमातून दिसत आहे. पण बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि जिंकून दाखवा. तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून जिंकलात. आमची मागणी बॅलेट पेपरची होती आणि आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आपण काम करावे, अशी आमची अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले. नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीसांनी पहिलं काम काय केलं?, संवेदनशील निर्णयाचं तुम्हीही कराल कौतुक!