मुंबई, 25 जानेवारी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या भाड्यात वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून आता एसटीच्या भाड्यात 14.95 टक्के वाढ होणार आहे. ही भाडेवाढ आज शनिवारी 25 जानेवारीपासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान, सर्वसामान्य प्रवाशांकडून एसटीच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली जात असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आंदोलन उभारले जाणार आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा –
एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातून सर्वसामान्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आता शिवसेना ठाकरे गटानेही याबाबत आक्रमक भूमिका घेत एसटीच्या तिकिटात भाडेवाढविरोधात राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. ठाकरेंच्या शिवसेने नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
अंबादास दानवे काय म्हणाले? –
अंबादास दानवे यांनी याबाबत बोलताना सांगितले की, तीन महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षांनी एसटी फायद्यात असून एसटीची सेवा खूप चांगली सुरु आहे, अशा प्रकारची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर हिवाळी अधिवेशनात एसटीचा 2 हजार 800 कोटींचा भ्रष्टाचार आम्ही समोर आणण्याचे काम केले. यामुळे ज्यापद्धतीने खासगी बसेस चालतात.
दरम्यान, आधीची बस 44 रुपये प्रति किलोमीटर ते ही डिझेलवर चालते आणि मग सरकारने एक नवीन करार केला होता. त्यामध्ये 35 रुपये प्रति किलोमीटर विना डिझेल 1 हजार 310 बसेस घेतल्या जात होत्या. मात्र, त्यानंतर आम्ही आवाज उठवला आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रक्रिया थांबवली. याचाच अर्थ एकीकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि दुसरीकडे एसटी बस तोट्यात गेली, असे सांगितले जाते. अशा परिस्थितीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागते. दरम्यान, शिवसेना याविषयी आंदोलन करणार आहे, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.
या प्रवाशांना बसणार फटका –
एसटी प्रवास महागल्यानंतर इतर खासगी वाहतूकदारही भाडेवाढ करतात. त्यामुळे सध्या राज्यात महिलांना एसटी प्रवास 50 टक्के मोफत, तसेच वृद्धांना मोफत आहे. मात्र, इतर प्रवाशांना दरवाढीचा फटका बसणार आहे. त्यामुळे इतरांना दिल्या जाणाऱ्या सवलवतीचा खर्च सामान्या नागरिकांकडून वसूल केला जात असल्याची संतप्त भावनाही प्रवाशी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा : msrtc fare hike : एसटीच्या तिकीटात वाढ, जळगाव जिल्ह्यात प्रवाशांना किती पैसे द्यावे लागणार?