बुलढाणा : आज होळी सणाच्या दिवशी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त तरुण शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. तसेच माझ्या आत्महत्येस सरकार कारणीभूत आहे, असे त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले.
काय आहे संपूर्ण घटना –
कैलास नागरे असे आत्महत्या केलेल्या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या तालुक्यात घडली. गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्यासाठी लढा देऊनही सकारात्मक प्रतिसाद न देण्यात आल्याने मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे, असे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील देऊळगाव राजा येथील शिवनी आरमाळ भागात कायमच पाण्याची चणचण जाणवते. ही समस्या दूर व्हावी यासाठी कैलास नागरे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन उभारले होते. यंदा ओव्हरफ्लो झालेल्या खडकपूर्णा धरणातून शिवनी आरमाळ येथील पाटबंधारे विभागाच्या लघु प्रकल्पात पाणी सोडावे, अशी नागरे यांची मागणी होती.
विशेष म्हणजे आंदोलनानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी कैलास नागरे यांना पाणी सोडण्याबाबत लेखी आश्वासनही दिले होते. मात्र, मार्च महिना उजाडला तरी ही मागणी मान्य झाली नाही. त्यामुळे अखेर कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत विषारी औषध पिऊन आपला जीवनप्रवास संपवला.
कैलास नागरे यांनी आत्महत्या करण्याआधी सुसाईड नोट लिहिली. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहिले की, “आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत. मात्र, तरीही पाणी येत नाही. माझ्यावर आता केळी आणि पपईच्या शेतात अंत्यसंस्कार करा व राख आनंदस्वामी धरणात टाका. मुख्यमंत्र्यांनी माझ्या मुलांचे पालकत्व स्वीकारावं. माझ्या मुलांचे शिक्षण करण्यासाठी मी असमर्थ ठरलो… स्वतः शून्य झालो.” तर राज्य सरकारने पुरस्कार देऊन सन्मानित केलेल्या या शेतकऱ्यानेच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.