महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा केला जातो. खरंतर, कृषी दिन हा केवळ शेती आणि शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस नसून, बळीराजाच्या संघर्षमय जीवनातून प्रेरणा घेण्याची संधीही आहे. या निमित्ताने शेतकऱ्यांच्या कष्टांचा सन्मान करण्याबरोबरच त्यांच्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार होणे, ही काळाची गरज आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्हचे विशेष प्रतिनिधी चंद्रकांत दुसाने यांचा कृषी दिनानिमित्त हा विशेष लेख.
प्रत्येक वेळी संकटात सापडणारा बळीराजा नव्या उमेदीने पुन्हा उभा राहतो. दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, वाढते उत्पादन खर्च, बाजारातील चढ-उतार, कर्जाचे ओझे आणि शेतीमालाला अपेक्षेप्रमाणे न मिळणारा भाव अशा असंख्य संकटांचा सामना करत तो संयमाने आणि जिद्दीने आपले जीवन जगत असतो. एका हंगामात मोठे नुकसान झाले तरी पुढील हंगामाची आशा न सोडता तो पुन्हा नव्याने शेतीची मशागत सुरू करतो. हीच त्याच्या आयुष्यातील खरी ताकद असून, याच जिद्दीमुळे देशाची अन्नसाखळी अखंड सुरू राहते. शेतकरी स्वतःच्या सुख-दुःखापेक्षा शेती आणि समाजाच्या गरजांना अधिक महत्त्व देतो. म्हणूनच त्याचे जीवन हे केवळ संघर्षाचे नव्हे, तर आशा, आत्मविश्वास आणि चिकाटीचे प्रतीक आहे.
आजच्या तरुणाईसमोर शिक्षण, रोजगार, स्पर्धा, आर्थिक अस्थिरता, सोशल मीडियामुळे निर्माण होणारा ताण आणि मानसिक नैराश्य यांसारखी अनेक आव्हाने उभी आहेत. काही तरुण या संकटांना धैर्याने सामोरे जातात, तर काही अपयश आल्यावर खचून जातात. अशा वेळी बळीराजाचे जीवन प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी ठरू शकते.
कितीही मोठे संकट आले तरी हार न मानता पुन्हा उभे राहण्याची ताकद शेतकऱ्याकडून शिकण्यासारखी आहे. तो अपयशाला शेवट मानत नाही, तर नव्या सुरुवातीची संधी मानतो. त्यामुळे एखादा चित्रपटातील नायक किंवा प्रसिद्ध सेलिब्रिटी नव्हे, तर कष्ट, प्रामाणिकपणा, संयम आणि चिकाटीचे प्रतीक असलेला बळीराजाच आपल्या तरुणाईचा खरा रोल मॉडेल ठरायला हवा.
आज समाजात यशाचे अनेक कृत्रिम मापदंड निर्माण झाले आहेत. पैसा, प्रसिद्धी आणि सोशल मीडियावरील लोकप्रियता यांनाच यश समजण्याची प्रवृत्ती वाढत आहे. मात्र, जीवनातील खरे यश हे संकटांवर मात करून पुन्हा उभे राहण्यात असते. हे बळीराजा आपल्या कृतीतून दररोज सिद्ध करत असतो. पाऊस वेळेवर पडेल की नाही, पिकाला योग्य भाव मिळेल की नाही, नैसर्गिक आपत्ती येईल की नाही, याची कोणतीही खात्री नसतानाही तो आशेचा धागा सोडत नाही. ही सकारात्मक वृत्ती प्रत्येक तरुणाने आत्मसात करण्याची गरज आहे.
राज्य सरकारने येत्या ५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. कर्जमाफीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो; मात्र हा कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळणे, सिंचनाच्या सुविधा वाढविणे, पीक विमा अधिक प्रभावी करणे आणि अवकाळी पाऊस, अतिवृष्टी किंवा गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून वेळेत आर्थिक मदत देणे या बाबींवर सरकारने अधिक गांभीर्याने काम करणे आवश्यक आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला, तरच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि देशाच्या विकासालाही नवी दिशा मिळेल.
कृषी दिन हा केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस नाही, तर बळीराजाच्या संघर्षाला सलाम करण्याचा, त्याच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचा आणि त्याच्या जिद्दीमधून प्रेरणा घेण्याचा दिवस आहे. पुन्हा पुन्हा संकटांना सामोरे जाऊनही न डगमगता उभा राहणारा बळीराजा हा प्रत्येक तरुणासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे. त्यामुळे त्याच्या जीवनातून संघर्ष, संयम, चिकाटी आणि आशावादाचा वारसा घेण्याचा संकल्प प्रत्येकाने करणे, हीच कृषी दिनानिमित्त बळीराजाप्रती व्यक्त केलेली खरी कृतज्ञता ठरेल.
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!







