मुंबई/जळगाव, 17 एप्रिल: राज्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून अनेक भागांमध्ये उष्णलहरींचा प्रभाव जाणवत आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यात देखील उकाडा वाढला असून तापमानाचा पारा हा 41 ते 42 अंशांपर्यंत पोहचला आहे. दरम्यान, आजही उष्णतेचा तडाखा कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यात काही भागात १८ आणि १९ एप्रिल रोजी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून यामुळे नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळू शकतो.
पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम –
भारतीय हवामान विभाग यांच्याकडून पुढील काही दिवसांत राज्यात तीव्र उष्णलहरींचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात १८ एप्रिलपर्यंत, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिलदरम्यान, विदर्भात १५ ते १९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. कोकणात १७ एप्रिल रोजी काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. वाढत्या तापमानामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे पुरेसे पाणी आणि ओआरएसचे सेवन करावे, सैल व हलके कपडे परिधान करावेत, तसेच घराबाहेर पडताना टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. शक्यतो सावलीत विश्रांती घ्यावी आणि दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे, असे सूचित करण्यात आले आहे. दरम्यान, उष्णतेशी संबंधित आपत्तीमध्ये मदतीसाठी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनासकडून करण्यात आले आहे.
हलक्या पावसाची शक्यता –
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १८ ते २१ एप्रिलदरम्यान काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. १६ ते १८ एप्रिलदरम्यान कमाल तापमानात मोठा बदल अपेक्षित नसला, तरी १९ ते २२ एप्रिलदरम्यान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
उन्हापासून बचाव करत असताना नेमकी काय काळजी घ्याल? –
- भरपूर पाणी प्या; तहान लागली नसली तरी नियमित पाणी घेत राहा.
- घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी, स्कार्फ किंवा छत्री वापरा.
- शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळा.
- हलके, सैल आणि सूती कपडे परिधान करा.
- लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखे द्रव पदार्थ आहारात समाविष्ट करा.
- उन्हात जास्त वेळ राहिल्यास मधूनमधून सावलीत विश्रांती घ्या.
- बाहेर जाताना सनस्क्रीनचा वापर करा.
- लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या.
- बंद गाडीत (car) कोणालाही, विशेषतः मुलांना, एकटे सोडू नका.
- उष्माघाताची लक्षणे (डोके दुखणे, चक्कर, उलट्या, अशक्तपणा) दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.






