चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 16 मार्च : बालपणीच आई-वडिलांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर मामांकडे राहून शिक्षण पुर्ण करत स्वतःच्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी उत्कृष्ट प्रयत्नांची जोड दिली आणि स्वतःच्या अस्तित्वाला वेगळी ओळख ज्या तरूणाने प्राप्त केलीय तो म्हणजे दीपक भगवान पवार. या तरूणाने खडतर प्रवासात संधींचा शोध घेत यशाचा प्रवास सुकर केल्याने त्याची महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागात गट-ब म्हणजेच जलसंधारण अधिकारी म्हणून निवड झाली आहे. दीपक पवार या तरूणाच्या या प्रेरणादायी प्रवासाची दखल घेत सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजने त्याच्यासोबत संवाद साधला. यावेळी त्याने आपल्या संघर्षमय आणि तितक्याच प्रेरणादायी प्रवासाबाबत माहिती दिली. (Deepak Pawar Success Story)
दीपक पवार या तरूणाचा प्रेरणादायी प्रवास –
दीपक पवार हा मूळचा पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील रहिवासी आहे. त्याचे वडील भगवान सुकलाल पवार आणि आई रेखाबाई भगवान पवार या दोघांचे बालपणीच निधन झाले होते. दरम्यान, एरंडोल तालुक्यातील कढोली येथील त्याचे मामा डॉ. नाना कडू बडगुजर यांच्याकडे राहून त्याने शिक्षण पुर्ण केले. यानंतर, मुक्त विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तरचे शिक्षण घेतले. याचबरोबर काही काळ नोकरीसोबतच स्पर्धा परिक्षेतील यशासाठी सातत्नाने केलेल्या प्रयत्नांमुळे त्याची महाराष्ट्र शासनाच्या जलंसधारण विभाग गट-ब (Class-2 Officer) मध्ये अनाथ प्रवर्गातून निवड झाली असून त्याने नुकताच पदभार स्विकारलाय.
दीपक पवार या तरूणाने सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजसोबत बोलताना सांगितले की, माझ्या बालपणीच वडिलांचे निधन झाले आणि पाचवीत असताना आईचा मृत्यू झाला. त्यानंतर मामांनी माझ्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्विकारल्याने त्यांच्याकडे राहून पुढील शिक्षण पुर्ण केले. यामध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, कढोली येथून तर डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग हे जळगावातील देवकर कॉलेजमधून पुर्ण केले. यानंतर काम करत असताना इंजिनिअरिंगच्या शिक्षणात आवड नसल्याने आणि स्पर्धा परिक्षेची आधीपासून आवड असल्याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
यादरम्यान शिक्षणासोबतच तीन वर्ष खासगी क्षेत्रात नोकरी केली. दरम्यान, मुक्त विद्यापीठातून राज्यशास्त्रमध्ये पदवी संपादन केल्यानंतर 2018 साली पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये मास्टर्ससाठी प्रवेश घेत पदव्युत्तर पदवी संपादन केली. दरम्यान, पुण्यात युपीएससीची तयारी करत असताना 2020 साली कोरोना महामारीच्या काळ सुरू झाला. कोरोनाकाळात तो त्याचे मोठे मामा नामदेव कडू बडगुजर व त्याचा मामेभाऊ गणेश नामदेव बडगुजर यांच्याकडे राहिला. यानंतर तो एमपीएससीकडे वळलो आणि घरूनच स्पर्धा परिक्षेसाठी तयारी सुरू केली. अशातच सेट परिक्षा उत्तीर्ण केल्यामुळे त्याला काही खासगी क्लासेसमध्ये शिकविण्यासाठी ऑफर येऊ लागल्या. मात्र, तो जामनेर आणि त्यानंतर अमळनेर येथे 2021 साली तासिका तत्वावर सहायक प्राध्यापक म्हणून तो रुजू झाला होता.
आधी चार नोकऱ्यांसाठी पात्र अन् आता जलसंधारण अधिकारी म्हणून नियुक्त –
महाराष्ट्र शासनाच्यावतीने 2023 साली मोठ्या प्रमाणात विविध विभागातील शासकीय जागांसाठी भरती करण्यात आली होती. यावेळी दीपकने विविध परीक्षांसाठी अर्ज करत संधीचे सोने केले आणि तो जवळपास चार नोकऱ्यांसाठी पात्र ठरला. यामध्ये कनिष्ठ अभियंता (अमरावती जिल्हा परिषद), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (अमरावती जिल्हा परिषद), सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट (जलसंपदा विभाग) आणि कालवा निरीक्षक (जलसंपदा विभाग) या चार नोकऱ्यांचा समावेश आहे. मात्र, त्याने सुरूवातीला अमरावी जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता पदावर रूजू होणे पसंत केले. यानंतर त्याची नुकतीच वर्ध्यात जलसंधारण अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
मनोबलमधील ‘ते’ एक वर्ष –
महाराष्ट्र शासनाच्यातर्फे 2023 साली मोठ्या प्रमाणात विविध विभागातील शासकीय जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर शासकीय नोकरीच्या संधी शोधत असलेल्या दीपकने अमळनेरात तासिका तत्वावर शिकवण्याची नोकरी सोडण्याचा निर्णय त्याने घेतला. यावेळी त्याने दीपस्तंभ फाऊंडेशनची परिक्षा उत्तीर्ण केली आणि मनोबल प्रकल्पात तो सहभागी झाला. मनोबल प्रकल्पात एक वर्षाहून कमी काळ राहून त्याठिकाणी स्पर्धा परिक्षेसाठी असलेल्या पोषक वातावरणात अभ्यास केला. दीपस्तंभाच्यावतीने वर्षभर आर्थिक मदत व मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन मिळाले.
दरम्यान, अमळनेर येथील नोकरी सोडण्याचा निर्णय मी माझ्या मामा-मामींना सांगितला नव्हता. ती मी स्वतःच्या जबाबदारीवर उचलेली जोखीम होती. अखेर, माझी अमरावतीत निवड झाल्यानंतर मी त्यांना याबाबत माहिती दिली असता त्यांना सुखद धक्का बसला होता, अशा आठवणी दीपक पवार याने सांगितल्या.
दीपकने दिलं यशाचे श्रेय –
जलसंधारण अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर त्याच्या यशाचे श्रेय देताना दीपक म्हणाला की, बालपणीच आई-वडिलांचं निधन झालं होतं. मात्र, माझे मामा डॉ. नाना कडू बडगुजर आणि शिक्षिका असलेल्या माझ्या मामी राजश्री नाना बडगुजर यांनी माझ्या शिक्षणाची जबाबदारी घेत माझा सांभाळ केला. यामुळे त्यांचं माझ्या यशात मोठं योगदान आहे. सामनेर येथील महात्मा गांधी विद्यालयातील एस.वाय. बेहरे सर तर कढोली येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील के. जी. बडगुजर, रत्नाप्रभा बडगुजर, बारी सर, सिसोदिया मॅडम या शिक्षक मंडळींचे देखील मला मार्गदर्शन मिळाले. मनोबल प्रकल्पात युजर्वेंद्र महाजन यासोबतच त्याठिकाणी कार्यरत असलेल्या व्यक्तींमुळे मला मोठा आधार मिळाला, यामुळे त्यांचे मी आभार मानतो.
यासोबतच शिक्षक तासिका तत्वावर अमळनेरला वरीष्ठ महाविद्यालयात शिकवत असताना कधी-कधी पगार उशीरा होत असे, त्यावेळी मला माझे जवळचे मित्र राहुल पाटील व राहुल नाथजोगी यांनी खूप आर्थिक मदत केल्याचे दीपकने सांगितले.
तरूणांना काय सल्ला दिला? –
स्पर्धा परिक्षेच्या तरूण-तरूणींना सल्ला देताना दीपक पवार याने सांगितले की, आजचे स्पर्धेचे युग असून त्यासाठी कठोर मेहनतीची आवश्यकता आहे. भावनेच्या आहारी न जाता आपल्याला स्पर्धा परिक्षा क्षेत्रात नेमकं किती वर्ष तयारी करायची आणि परिक्षेच्या दृष्टीकोनातून व्यवस्थित नियोजन करत त्यासाठी स्वतःला झोकून देणे गरजेचे आहे. मिळालेल्या संधीचे सोनं करता आले पाहिजे. दरम्यान, करिअरच्या सुरक्षिततेसाठी स्पर्धा परिक्षेसोबतच प्लॅन बी देखील तयार ठेवणे महत्वाचे असल्याचे दीपक पवारने सांगितले.
हेही पाहा : मुक्त विद्यापीठात शिक्षण, शिपाई ते आता आर्मीत मोठा अधिकारी lieutenant ashok patil khandesh interview