मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला ऐतिहासिक असे यश मिळाले. मात्र, निवडणुकीच्या निकालाला आठवडाभरापेक्षा जास्त कालावधी होऊनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यातच आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा वर्णी लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्यापही त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेता निवड झाल्यानंतर संबंधित नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. त्यासाठी भाजपचे दोन निरीक्षक मुंबईत दाखल होतील, यानंतर विधीमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड होईल, असे सांगितले जात आहे. मात्र, हे दोन निरीक्षक नेमके कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता हे दोन निरीक्षक कोण असतील, त्यांची नावे समोर आली आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण हे भारतीय जनता पक्षाच्या निरीक्षक असणार आहोत. त्यांच्या निरीक्षणाखाली महाराष्ट्र भाजपच्या विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होणार आहे. भाजपचे हे दोन्ही जेष्ठ नेते मुंबईत दाखल होतील आणि यानंतर त्यांच्या निरीक्षणाखाली भाजपच्या विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होणार आहे.
भारतीय जनता पक्षाची अशी पद्धत राहिली आहे की, ज्या ज्या त्यांचे सरकार स्थापन होते, त्याआधी केंद्रातून निरीक्षक त्या राज्यात जातात आणि त्या राज्याच्या भाजपच्या विधीमंडळ गटनेत्याची निवड करतात आणि तोच नेता मुख्यमंत्री असतो. त्यामुळे आता मुंबईत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण हे दोन्ही नेते ज्या नेत्याची विधिमंडळ पक्षनेते म्हणून निवड करतील, तोच नेता राज्याचा मुख्यमंत्री होईल. 4 तारखेला ही घोषणा होणार आहे, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण होणार, हे परवा 4 तारखेला जाहीर होणार आहे.