धुळे, 13 सप्टेंबर : बैल पोळा सण शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सण मानला जातो. अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपरिक अन् लोकसंस्कृतीचा वारसा असलेला ह्या सणावर यंदा मात्र, महागाई सोबतच लम्पीचा प्रार्दुभाव व दुष्काळाचे सावट आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महागाई वाढल्याने बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या आवश्यक साहित्यांचे दर वीस ते तीस टक्क्यांनी वाढले आहे.
शेतकऱ्यांना महागाईचा फटका –
धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी भरलेल्या आठवडे बाजारात पोळ्यासाठी विविध साहित्याची दुकाने सजली आहेत. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत दुकानदारासह खरेदीदारांची गर्दी जेमतेम असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. दरवर्षी पोळा सणाला बैलांसाठी नवीन साहित्य खरेदी करून त्यांची सजावट करणाऱ्या शेतकऱ्यांनी महागाईमुळे बाजाराकडे पाठ फिरवून जुनेच साहित्य वापरण्याचा निर्णय घेतल्याने यंदा बाजारात थंड प्रतिसाद मिळत आहे.
दुष्काळाचे सावट –
धुळे तालुक्यात मागील काही वर्षांपासून ट्रॅक्टरचा प्रत्येक कामांसाठी उपयोग वाढल्याने बैलांची संख्या झपाट्याने कमी होऊन सणाची व्यापकताही कमी झाली. त्यामुळे साजश्रृंगाराच्या सहित्याला परिणामी, शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने पिकांची स्थिती नाजूक असून खरीप हंगामात केलेला खर्च पदरात पडणे कठीण आहे.
बैलांची करतात सजावट –
अनेक शेतकरी उधारी-उसनवारी करून पोळा सणासाठी बैलजोडीच्या साजाची खरेदी करत आहेत. बैलांचे शेती व्यवसायात विशेष महत्त्व असल्याने ते शेतकऱ्यांचा सोबती म्हणून ओळखला जातो. शेतकऱ्यांसाठी त्यांचे बैल वर्षभर शेतात राबतात. त्यामुळे बैलांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी पोळ्याच्या दिवशी बैलांची रंगरंगोटी व सजावट करून पूजा केली जाते.
बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य –
पोळ्याच्या पहिल्या दिवशी बैलांचे खांदे तूप व हळदीने मळणी केले जाते. सलग दोन ते तीन दिवस बैलांना साबणीने आंघोळ घालून त्यांना पुरणपोळी व नैवेद्य भरवला जातो. परंतु यंदा पिण्याच्या पाण्याचीच पंचाईत असून सर्वत्र जलसाठे कोरडे राहून बैलांना आंघोळ घालण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. तसेच यंदा जिल्ह्यात २८ जूनपासून गायब झालेल्या पावसामुळे खरिप पिकांची स्थिती नाजूक बनली होती; पण दोन दिवसांपासून रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काहीसे हास्य फुलले आहे.
वरूळच्या आडवडे बाजाराची स्थिती –
वरूळच्या आठवडे बाजारात वेसण ४० ते ५० रुपये जोड, कासरा ८० ते २०० रुपये, मोरखी ५० ते १२५ रुपये, कवडी गेठा १०० रुपये, गोंडा ५० ते १५० रुपये, घागरमाळ जोडी एक हजार ते दीड हजार रुपये भोरकडी ५० ते १०० रुपये जोडी, झुली दोन ते अडीच हजार रुपये,मोरक्या जोड ६० ते ११० रुपये तर हिंगुळ ५० ग्रॅमचा डबा पन्नास रुपये तर १०० ग्रॅमचा ८० रुपये प्रमाणे किमती असल्याचे पाहायला मिळाले.