मुंबई, 14 एप्रिल : राज्यात एकीकडे कड्याक्याचे उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे राज्यातील विविध भागात अवकाळी पावासाने हजेरी लावलीय. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, बदलत्या हवामानामुळे नागरिक हैराण झाले असताना पुन्हा एकदा मुंबईसह राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हवामान विभागाचा अंदाज काय? –
राज्यात सध्या एकीकडे उन्हाचा जोर कायम आहे. तर दुसरीकडे पावसालाही पोषक वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक भागांमध्ये येत्या काही तासांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईत पुढील दोन दिवस पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासोबतच पुढील दोन दिवस राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय.
जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे नुकसान –
रावेर तालुक्यात 12 एप्रिल रोजी व जळगाव तालुक्यात 13 एप्रिल रोजी आलेल्या वादळी वाऱ्यांसह पावसामुळे व गारपिटीनंतर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. विशेषतः रावेर शहरासह भोकर, भादली खुर्द परिसरामध्ये तसेच जिल्ह्यात इतर ठिकाणीही केळी व मका या नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तात्काळ पंचनाम्याचे निर्देश दिल आहेत.
दरम्यान, उन्हाच्या तडाख्यानंतर थोडासा गारवा अनुभवास आला असला तरी गारपिटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून काही शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे.