वाडा (पालघर) – युवा परिवर्तन संस्थेतर्फे वाडा तालुक्यातील शिरसाड, सरोवार आणि डहाळी या 3 गावातील 150 आदिवासी महिला शेतकऱ्यांना गांडूळ खत कसे बनवावे, याचे नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी गावात ज्यांच्याकडे गायी आणि गुरे, कोंबड्या आहेत अशा महिला शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. नेमका ही प्रक्रिया कशी झाली, याचबाबत आपण जाणून घेऊयात.
ज्या महिलांकडे गायी आणि गुरे, कोंबड्या आहेत, अशा महिला शेतकऱ्यांची यामध्ये निवड करण्यात आली. तसेच या महिलांना 3 महिन्यात गांडूळ खत कसे बनवावे, त्याचे फायदे काय आहे आहेत, याचबरोबर गांडूळ खताचा व्यवसाय करून आपण कसे पैसे कमावू शकतो, याचे प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षण वर्गानंतर महिला गांडूळ खत बनवत आहेत. यात 150 महिलांना कीट देण्यात आले असून यात, 100 किलो क्षमतेचे 3 ड्रम आणि 250 ग्रॅम गांडूळ आहेत. या ड्रममध्ये हे टाकाऊ अन्न, कचरा, पालापाचोळा टाकल्यावर दोन महिन्यांनी गांडूळ खत तयार होईल, असे सांगण्यात आले.
3 हजार रुपयांची बचत –
याबाबत युवा परिवर्तन संस्थेचे समन्वयक सचिन बारवे यांनी सांगितले की, ‘प्रत्येक शेतकऱ्याला एका वेळेस 2 ते 3 रासायनिक खताच्या बॅगा लागतात. यासाठी साधारण 3 हजार रुपये खर्च होतात. रासायनिक आता या महिला शेतकरी घरच्या घरी गांडूळ खत बनवत असल्याने यांचा खर्च कमी होईल. गांडूळ खत हे नैसर्गिक असून पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त असते. यासाठी आम्ही दुबार तिबार पीक आणि दुभती जनावर ज्या महिला शेतकऱ्यांकडे आहेत, अशा महिला शेतकऱ्यांची निवड केली, असेही सचिन बारवे म्हणाले.
महिलांनी दिली हा प्रतिक्रिया –
ज्योती तरे या शिरसाड गावच्या रहिवासी आहेत. आधी त्यांचा मुलगा गांडूळ खत बाजारातून विकत आणायचा. याबाबत त्यांनी सांगितले की, ‘या प्रशिक्षण वर्गामुळे मला गांडूळ खत घरी कसे बनवायचे हे समजले. सध्या आम्ही ड्रममध्ये रोजचा टाकाऊ भाजीपाला, पालापाचोळा टाकत असून 2 महिन्यांनी गांडूळ खत तयार होईल. या गांडूळ खताचा उपयोग आम्ही पिकांसाठी करणार आहे’, असे त्या म्हणाल्या.