जळगाव, 30 ऑगस्ट: ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५व्या वर्षात पदार्पणानिमित्त मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे आयोजित अमृत महोत्सव सोहळ्यात राज्यातील विविध पक्षांचे दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर आले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून झालेल्या या सर्वपक्षीय उपस्थितीमुळे सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा रविवारी उत्साहात पार पडला.
अमृत महोत्सवात सर्वपक्षीय नेते उपस्थित –
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर, शशिकांत शिंदे, बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, गुलाबराव देवकर, दिलीप कांबळे, खासदार भास्कर भगरे, आमदार अभिजित पाटील यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे दिंडी सोहळ्याद्वारे व्यासपीठावर स्वागत करण्यात आले. खडसे परिवार व अमृत महोत्सव समितीतर्फे संत मुक्ताईची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आमदार एकनाथराव खडसे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
भाजप विस्तारात खडसेंचे योगदान महत्त्वाचे : शरद पवार
अध्यक्षीय मनोगतात शरद पवार यांनी एकनाथराव खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचा गौरव केला. महाराष्ट्रात भाजपचे अस्तित्व मर्यादित असताना पक्ष तळागाळात रुजविण्यासाठी प्रमोद महाजन आणि एकनाथ खडसे यांनी मोठे योगदान दिले. महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांची यादी खडसे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे पवार यांनी सांगितले.

विधिमंडळातील खडसेंच्या अभ्यासपूर्ण आणि आक्रमक कामगिरीचाही पवार यांनी उल्लेख केला. शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारा नेता म्हणून खडसे वेगळे ठरले, असे ते म्हणाले.
उत्तर महाराष्ट्रात भाजप वाढविण्यासाठी नाथाभाऊंची मेहनत : जयंत पाटील
माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर महाराष्ट्रात भाजपचा विस्तार करण्यासाठी खडसे यांनी घेतलेल्या मेहनतीचा गौरव केला. शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक सिंचन योजना पूर्णत्वास नेण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून प्रभावीपणे काम कसे करावे, हे खडसेंनी कृतीतून दाखवून दिले, असेही पाटील म्हणाले.
आक्रमक, संघर्षशील नेतृत्व : वळसे पाटील
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खडसे यांच्या संघर्षशील नेतृत्वाच्या आठवणी सांगितल्या. १९९० मध्ये आपण दोघेही प्रथमच विधानसभेत निवडून आलो. त्यावेळी खडसे विरोधी पक्षनेते म्हणून सरकारवर आक्रमकपणे हल्ला चढवत जनतेचे प्रश्न मांडत असत, असे वळसे पाटील यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करून खडसे यांना शुभेच्छा दिल्या. राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक संबंध जपले पाहिजेत, असे सांगत त्यांनी खडसे यांच्याशी असलेल्या जुन्या ऋणानुबंधांचाही उल्लेख केला.
“पवारांनी योग्य वेळी राजकीय आसरा दिला” –
सत्काराला उत्तर देताना एकनाथराव खडसे यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासातील संघर्ष, चढ-उतार आणि जुन्या राजकीय संबंधांना उजाळा दिला. १९७८ मधील पहिल्या निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभव झाल्याची आठवण त्यांनी सांगितली.
भाजपसाठी अनेक दशके निष्ठेने काम केल्याचा उल्लेख करताना खडसे यांनी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्यासोबतच्या राजकीय प्रवासाच्या आठवणी सांगितल्या. २००० ते २०१४ या काळात राज्यात भाजपची सत्ता नसतानाही पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी या नेत्यांनी मोठे योगदान दिले, असे ते म्हणाले.

आपल्या राजकीय आयुष्यात आलेल्या संकटांचा उल्लेख करताना खडसे यांनी शरद पवार यांचे विशेष आभार मानले. “योग्य वेळी शरद पवार यांनी आशीर्वाद आणि राजकीय आसरा दिला नसता, तर कदाचित राजकारणाच्या पडद्यामागे फेकले गेलो असतो. काही काळ ‘ब्रेकवर’ होतो; पवारांनीच पुन्हा राजकीय प्रवाहात आणले,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
पूर्वी राजकीय मतभेद तीव्र असले तरी वैयक्तिक वैमनस्य नसायचे. आजच्या बदललेल्या राजकीय वातावरणाबद्दल खडसे यांनी खंत व्यक्त केली. पुत्राच्या निधनानंतर कुटुंबीय आणि जनतेने दिलेल्या आधारामुळे आपण पुन्हा उभे राहू शकलो, असे सांगताना ते भावुक झाले.
विविध मान्यवरांकडून गौरव –
शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील, रासपचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांनीही खडसे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव केला. माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविला, तर पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.

अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी खडसे यांच्या सुमारे ४० वर्षांच्या राजकीय जीवनाचा आढावा घेतला. हा कार्यक्रम कोणत्याही राजकीय हेतूने नव्हे, तर त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ह.भ.प. विशाल महाराज खोले यांनी सन्मानचिन्हाचे वाचन केले. भोरगाव लेवा पंचायत, ठाया-पाडळसेतर्फेही खडसे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. समितीचे सचिव प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी आभार मानले.
या सोहळ्यास जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो नागरिक, कार्यकर्ते व खडसे समर्थक उपस्थित होते. सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती, जुन्या राजकीय संबंधांना मिळालेला उजाळा आणि खडसे यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीचा झालेला गौरव यामुळे कोथळीतील हा सोहळा संस्मरणीय ठरला.






