जळगाव : रावेर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधील शेत रस्त्यांवरील अतिक्रमण हटवून 15 किलोमीटर लांबीचे रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. त्यामुळे 750 हून अधिक शेतकऱ्यांना शेतीसाठी वाहतुकीचा मार्ग सुकर झाला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार महसूल प्रशासनाने ही मोहीम राबवली.
गेल्या काही वर्षांत या भागातील शेत रस्त्यांवर अनधिकृत अतिक्रमण झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार प्रशासनाने तातडीने पावले उचलत ही अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेतली. तहसील प्रशासन, महसूल विभाग व पोलीस दलाच्या संयुक्त कारवाईत 15 किलोमीटर लांबीचे शेत रस्ते मोकळे करण्यात आले, ज्याचा थेट फायदा 750 हून अधिक शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यांनी दिली.
या भागात काढण्यात आले अतिक्रमण –
निभोरा मंडळ,खिर्डी मंडळ, सुनोदा शेतरस्ता, खानापुर मंडळ, खानापुर निरुळ शिवरस्ता, खिडी मंडळ, सुनोदा शेतरस्ता, सावदा मंडळ, उदळी लुमखेडा शिव रस्ता, खानापुर मंडळ, अजनाड जुने गावठाण, ऐनपुर मंडळ, धामोडी शेतरस्ता, ऐनपुर मंडळ, धामोडी शिगांडी शिवार, अजंदा ते नांदुखेडा शिवरस्ता या ठिकाणचे शेत रस्त्यातील अतिक्रमण काढण्यात आली.
शेतकऱ्यांची मागणी –
या मोहिमेमुळे शेतकरी वर्गाला शेतीसाठी आता अधिक सुलभ आणि मोकळा मार्ग उपलब्ध झाला आहे. भविष्यातही अशाच प्रकारे सातत्याने कारवाई व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
हेही वाचा – Breaking : ग्रामसेवकाने 25 हजारांची मागितली लाच अन् जळगाव एसीबीने पकडले रंगेहाथ, नेमकं प्रकरण काय?