जळगाव, 7 जुलै: जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील कारवाईला आणखी बळ देत जळगाव पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या आठ गुन्ह्यांमधील तब्बल 930 किलो 820 ग्रॅम सुका गांजा नष्ट केला. या जप्त गांजाची अंदाजित किंमत 1 कोटी 86 लाख 16 हजार 400 रुपये इतकी आहे. याबाबतची माहिती जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई –
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, केंद्र शासन तसेच महाराष्ट्र पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (ANTF) यांच्या सूचनांप्रमाणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेल्या अंमली पदार्थांचा तातडीने नाश करण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तथा अंमली पदार्थविरोधी पथकाचे नोडल अधिकारी राहुल गायकवाड यांनी केंद्रीय मुद्देमाल कक्षात जमा असलेल्या जप्त अंमली पदार्थांचा आढावा घेतला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेल्या आठ गुन्ह्यांतील गांजा नष्ट करण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ मुद्देमाल नाश समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. समितीने पडताळणी करून त्यास मंजुरी दिली.
त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या इमारतीमागील मोकळ्या जागेत जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया पार पडली. पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल, याची काळजी घेत खड्डा खोदून गांजाचा नाश करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले.
ही कारवाई अंमली पदार्थांविरोधातील पोलिसांच्या कठोर भूमिकेचे द्योतक मानली जात असून, भविष्यातही अशाच प्रकारे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेल्या अंमली पदार्थांचा नाश करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
यांनी केली कारवाई –
सदरची नाश प्रक्रिया पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक (गृह) संजय गायकवाड, कृषी विभागाचे प्रतिनिधी विकास बोरसे तसेच वजन-मापे विभागाचे निरीक्षक गौतम बाविस्कर उपस्थित होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय दोरकर तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील, संदीप चव्हाण, जयंत चौधरी आणि राहुल बैसाणे यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.






