औरंगाबाद, 12 फेब्रुवारी : सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळावी, यासाठी प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण कार्यालय औरंगाबाद यांच्यावतीने विभागीय स्तरावर कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आणि समाज कल्याण विभाग आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन औरंगाबाद येथे या कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
विभागीय कला आविष्कार महोत्सव या कार्यक्रमाचे उद्घाटन नंदा गायकवाड (उपायुक्त, मनपा औरंगाबाद) प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पांडुरंग वाबळे (सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय औरंगाबाद), रविंद्र शिंदे (सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय बीड), प्र. शि. निंबाळकर (सहाय्यक संचालक वित्त व लेखा) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
उद्घाटनीय भाषण करताना नंदा गायकवाड यांनी शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना कला महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
तर शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थ्यां हे सर्वगुणसंपन्न व्हावेत यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असल्याचे या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका जयश्री सोनकवडे (प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग औरंगाबाद) यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना सांगितले. तसेच अभ्यासासोबतच अशा कला महोत्सव च्या माध्यमातून सप्त गुणाच विकास होतो, असे प्रतिपादनही त्यांनी याप्रसंगी केले.
हेही वाचा – “डिजिटल मीडियाच्या प्रभावात बातमीची विश्वासार्हता जपणे महत्वाचे”
या कला आविष्कार महोत्सवात औरंगाबाद विभागातील 11 निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. तसेच या कला महोत्सवात 79 विद्यार्थी व 64 विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. यामध्ये मुलांचे 8 व मुलींचे 6 संघ असे एकुण 14 संघ सहभागी होणार आहेत. या महोत्सवात भुमिका अभिनय व सामुहिक नृत्यांचे सादरीकरण केले जाणार आहे. लोकनृत्य, सामाजिक प्रश्नावर देशभक्तीपर तसेच सायबर क्राईम स्त्रीभ्रूणहत्या इत्यादी विषयावरती सदर विद्यार्थी आहे त्यांचे कलागुण दाखवणार आहेत.
या स्पर्धेस प्राध्यापक के बी आगारे, प्राध्यापक सी तु राठोड,व प्राध्यापक गहिनाथ वाळेकर हे परिक्षक म्हणून कामकाज बघणार आहे. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निलेश भामरे, यांनी केले तर आभार प्रदर्शन पांडुरंग वाबळे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय औरंगाबाद यांनी केले. या कार्यक्रमाचे शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.