मुंबई, 19 जून: राज्यात गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मान्सूनच्या प्रवासाबाबत अखेर एक दिलासादायक बातमी आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात खोळंबलेला नैऋत्य मोसमी पाऊस २४ आणि २५ जूनपासून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. यामुळे जूनच्या मध्यात पावसाने दिलेल्या ओढीमुळे चिंतेत असलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यंदा मान्सूनने ८ जून रोजी दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत वेळेत एन्ट्री केली होती. मात्र, त्यानंतर अरबी समुद्रातील मोसमी वारे कमकुवत झाले आणि बंगालच्या उपसागरात कोणतीही मजबूत प्रणाली तयार झाली नाही. परिणामी, मान्सूनची पुढची वाटचाल थांबली आणि तो रत्नागिरीतील हर्णे, सातारा आणि सोलापूर या पट्ट्यातच रेंगाळला. दरम्यान, मान्सूनच्या या खंडामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, बहुतांश जिल्ह्यांमध्ये तीव्र उकाडा आणि उष्णतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, आता वातावरणात पुन्हा एकदा अनुकूल बदल होत आहेत. २४ जूनच्या सुमारास कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढेल. त्यानंतर २५ जून ते १ जुलै दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण पट्ट्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण भाग ओलांडल्यानंतर मोसमी वारे सह्याद्री पार करून मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दिशेने पुढे सरकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पेरणीसाठी घाई न करण्याचा सल्ला –
मान्सून लांबल्यामुळे अनेक भागांत खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. कृषी विभाग आणि हवामान तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, केवळ स्थानिक पातळीवर होणाऱ्या पूर्व-मोसमी किंवा हलक्या पावसावर विसंबून पेरणीची घाई करू नये. २४ ते २५ जून दरम्यान चांगला आणि पुरेसा पाऊस झाल्यानंतर, जमिनीमध्ये पुरेशी ओल निर्माण झाल्यावरच खरीप पेरण्या कराव्यात, जेणेकरून दुबार पेरणीचे संकट ओढवणार नाही.






