अंतरवाली (जालना), 25 जानेवारी : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आजपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. जरांगे यांच्या आमरण उपोषणाला आज सकाळी 10 सुरुवात झाली. दरम्यान, त्यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील दहा मागण्या तात्काळ पुर्ण करण्याचे मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीकरता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे आज 25 जानेवारीपासून उपोषण सुरू झाले आहे. सगेसोयरे कायदा अंमलबजावणीसाठी जवळपास एक वर्ष लागले. एक वर्षापासून समाज रस्त्यावर आहे. तरी आजही मराठे त्याच ताकदीने उभे आहेत. असे असतानाही आमच्या त्रासाची जाण सरकारला नाही. म्हणून सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या तात्काळ पुर्ण कराव्यात असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.
सरकारसोबत बोलणे झालेले नाही – मनोज जरांगे
मनोज जरांगे मराठा समाजाला आवाहन करत पुढे म्हणाले की, मराठा बांधवांना माझी विनंती आहे की कुटुंबाने परवानगी दिली नसेल तर उपोषणाला बसू नका आणि मी एकटाच उपोषण करायला पुरेसा आहे. यामुळे केवळ तुमचा आशीर्वाद आणि साथ मला द्या. उपोषण सुरू करण्यापूर्वी सरकारशी कोणतेही बोलणे झाले नसल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ठ केले आहे.
- मराठा आरक्षणासंदर्भातील खालील 10 मागण्या मान्य होण्यासाठी आमरण उपोषण –
- सरसकट कुणबी प्रमाण द्या.
- सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी तातडीने लागू करा.
- कुणबी नोंदीच्या आधारावर त्यांना आरक्षण द्यावे.
- सगळ्या सगे सोयऱ्यांचा व्यवसाय एकच आहे त्यामुळे मागेपुढे न पाहता कुणबी दाखले दिले जावेत.
- न्यायमुर्ती संपत शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्या.
- दाखल्यांसाठी विशेष कक्ष पुन्हा सुरु करा.
- आंदोलकरांवरील गुन्हे मागे घ्या.
- सातारा-औंध-मुंबई-हैद्राबाद गॅझेट लागू करा.
- आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबाला निधी आणि शासकीय नोकरी द्या.
हेही वाचा : msrtc fare hike : एसटीच्या तिकीटात वाढ, जळगाव जिल्ह्यात प्रवाशांना किती पैसे द्यावे लागणार?