जळगाव, 3 एप्रिल : राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झालीय. असे असताना काल राज्यातील कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी तसेच वर्धा, जालन्यासह विविध विभागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. दरम्यान, ऐन काढणीला आलेल्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
अवकाळीमुळे शेतपिकांचे नुकसान –
गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यात अवकाळी पावासाची स्थिती निर्माण झालीय. असे असताना राज्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा केळी, द्राक्ष, कांदा, पपई सोबतच रब्बी हंगामातील गहू, मका, ज्वारी आदी पिकांना फटका बसलाय. यासोबतच कोकणात आंबा-काजू बागायतदार शेतकऱ्यांना देखील अवकाळीचा फटका बसलाय.
जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट –
पुढील पाच दिवस राज्यात अवकाळी पावसासह गारपीटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने जळगावसह, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नाशिक घाट, सातारा, सातारा (घाट), सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम तसेच यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. यासोबतच अहिल्यानगरसह पुणे घाट, कोल्हापूर घाट, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय? –
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली जातेय. रब्बी हंगामाची पिके ऐन काढणीला आले असताना अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकरी हवालदिल झालाय. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आज आणि उद्या अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही पाहा : शेतकरी कुटुंबातील ऋषिकेश बनला पाचोरा तालुक्यातील पहिला न्यायाधीश | Success Story