बारामती, 28 जानेवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवीपणे निधन झाले आहे. मुंबईवरून बारामतीला जाण्यासाठी त्यांचे विमान निघाले होते. दरम्यान, बारामतीत लँडिंग होत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. यामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाबद्दल राज्यसभा खासदार शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांनी काय म्हटलंय? –
‘अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला एक प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्त्ववान, निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे, अशा व्यक्तीला महाराष्ट्र मुकला. जे काही नुकसान झालं, ते भरुन निघणारं नाही. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. मी आज मीडियासमोर येणार नव्हतो. पण परंतु काही वृत्तपत्रे, या अपघाताच्या मागे काहीतरी राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरुन मांडली गेली. याच्यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सर्वांना सतत बसतील. कृपा करुन इथं राजकारण आणू नये, एवढंच सांगायचंय.’
बारामती विमान अपघातात अजित दादांचे निधन –
राज्यात 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज मुंबईवरून सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी बारामतीसाठी रवाना झाले होते. बारामतीत पोहचण्यासाठी पाच मिनिटांचा वेळ उरला असतानाचा सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या विमानाचा अपघात झाला. यामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, महाराष्ट्राचं दादा नेतृत्त्व आज हरपल्याच्या भावना आता व्यक्त केल्या जात आहेत.
अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार –
अजित पवार यांचे पार्थिव आज संध्याकाळपर्यंत बारामतीत अंतिम दर्शनासाठी ठेवले जाण्याची शक्यता आहे. उद्या, सकाळी सुमारे 11 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर बारामतीतील मिशन हायस्कूल मैदानावर किंवा पवार कुटुंबाच्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राज्य सरकारने राजकीय शोक जाहीर केला असून, अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना दिली जाणार आहे.
हेही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू; पंतप्रधान नरेंद्र मोदींची भावूक पोस्ट






