पाचोरा, 30 मार्च: पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (CISF) जवान बापू कोळी यांना कर्तव्य बजावताना वीरमरण आले असून, त्यांच्या पार्थिवावर आज लोहारी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत साश्रुपूर्ण नयनांनी या वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी ‘अमर रहे… अमर रहे… बापुदादा… अमर रहे!’ अशा घोषणा देण्यात आल्या.
शहीद जवान बापू कोळी यांना अखेरचा निरोप –
बापू कोळी यांचे 27 मार्च रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जात असताना निधन झाले. नाशिक येथून त्यांची जलपाईगुडी येथे निवडणूक कर्तव्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. रेल्वेने प्रवास करत असताना जलपाईगुडीजवळ त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
वीर जवान बापू कोळी यांचे पार्थिव पश्चिम बंगालमधून विशेष विमानाने मुंबई विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर 30 मार्च रोजी सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी लोहारी (ता. पाचोरा) येथे दाखल झाले. गावात पार्थिव पोहोचताच ते त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले आणि विधीवत पूजा करण्यात आली.
यानंतर तिरंग्यात लपेटलेले पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवर ठेवून वीरजवान बापू कोळी यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ‘अमर रहे… अमर रहे… बापुदादा… अमर रहे!’ अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान, अमरधाम परिसरात उभारण्यात आलेल्या विशेष चौथाऱ्यावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. यानंतर त्यांच्या मुलाने पित्याच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
वीर जवान यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी खासदार स्मिता वाघ यांच्यावतीने भैरवी वाघ पलांडे, पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचावतीने सुमित किशोरआप्पा पाटील. तसेच भाजप नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, माजी आमदार दिलीप वाघ, पाचोरा तहसिलदार विजय बनसोडे, पिपळगाव हरे. सपोनि कल्याणी वर्मा, जिल्हा सैनिक अधिकारी विश्वनाथ उगले, सीआएसएफचे सहायक उपनिरीक्षक एम.के.पाटील, डी.बी.मोरे, लोहारीच्या सरपंच रंजना पाटील, ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी तसेच पोलीस पाटील, भाजपचे सुभाष पाटील, पं.स. सभापती डॉ. भरत पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थ, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
24 वर्षे बजावली देशसेवा –
बापू कोळी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे लोहारी गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. 2 ऑगस्ट 2002 रोजी त्यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) प्रवेश घेतला होता. तब्बल 24 वर्षे त्यांनी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने देशसेवा बजावत आपले कर्तव्य पार पाडले. सध्या ते नाशिक येथील नोटप्रेसमध्ये कार्यरत होते. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून पुढे येत, जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर त्यांनी ही नोकरी मिळवली होती.






