जळगाव, 31 मार्च: महाराष्ट्रात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मोठी पावले उचलली आहेत. याचाच भाग म्हणून पक्षाकडून लोकसभा संपर्क प्रमुख आणि विभागीय संपर्क प्रमुख यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंच्यावतीने आमदार आणि खासदारांना खास जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
राज्यातील वेगवेगळ्या भागांची जबाबदारी अनुभवी नेत्यांकडे देण्यात आली असताना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील आणि जळगाव लोकसभेचे माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यावर देखील मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुखपदाच्या नियुक्त्या –
निवडणुका संपताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील नेत्यांना तात्काळ कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाची पकड अधिक मजबूत करणे, शासनाच्या योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवणे आणि संघटन अधिक बळकट करणे, हे या नियुक्त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले जात आहे.
आमदार किशोर आप्पांची अमरावती लोकसभेच्या संपर्कप्रमुखपदी नियुक्ती –
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची अमरावती लोकसभेच्या संपर्कप्रमुखपदी करण्यात आली आहे. मागील वर्षी पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात पाचोरा आणि भडगावमध्ये शिवसेनेला अभुतपुर्व यश मिळालं. यानंतर महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना राज्यात विविध ठिकाणी प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती.दरम्यान, आता त्यांच्यावर अमरावती लोकसभेच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
उन्मेश पाटील यांच्यावर धाराशिव लोकसभेच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी –
माजी खासदार उन्मेश पाटील यांची धाराशिव लोकसभेच्या संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उन्मेश पाटील यांनी 7 मार्च रोजी ठाकरेंच्या शिवसेनेला सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उन्मेश पाटील यांनी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून 2014 ते 2024 या काळात प्रतिनिधित्व केलंय. तर 2024 पासून ते मार्च 2026 पर्यंत ते ठाकरेंच्या शिवसेनेत होते. मात्र, आता त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर धाराशिव लोकसभा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.






