जळगाव, 25 एप्रिल: जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे दि. २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते रात्री १०.३० या वेळेत विशेष नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे २१०० ते २२०० वाहनांची कसून तपासणी करण्यात आली असून विविध नियमांच्या उल्लंघनापोटी २ लाख ३८ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्हाभरातील ५९ नाकाबंदी पॉइंट्सवर कडक तपासणी करण्यात आली. यासाठी ४८ पोलीस अधिकारी व २१६ पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले होते.
नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायद्यान्वये ३७४ केसेस नोंदवण्यात आल्या. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ५ चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्या ४६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, तर उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या १३ व्यक्तींवर एकूण १५ केसेस दाखल करण्यात आल्या.
ही कारवाई जळगाव शहरातील एमआयडीसी, शनिपेठ, जिल्हापेठ, रामानंद नगरसह भुसावळ, रावेर, चोपडा, चाळीसगाव आणि पाचोरा या भागांत मोठ्या प्रमाणावर करण्यात आली.
या मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसण्यास मदत होणार असून नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करून वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.






