मुंबई, 22 जून: नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला असून अपक्ष उमेदवार गोकूळ गीते यांनी विजय मिळवला आहे. या अनपेक्षित निकालामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या पराभवानंतर शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नाशिक विधानपरिषद निवडणुकीचा लागलेला हा निकाल मला आधीपासूनच अपेक्षित होता, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
नाशिकच्या निकालावर प्रतिक्रिया देताना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, नाशिक विधानपरिषद निवडणुकीचा लागलेला हा निकाल मला अपेक्षितच होता आणि म्हणून याच पार्श्वभूमीवर आम्ही जळगावमध्ये दोन अपक्ष उमेदवार दिलेले होते. परंतु, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आमच्या अपक्ष उमेदवारांना मुंबईत बोलवून घेतले होते. त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचे आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून जळगाव जिल्ह्यातील शिवसेना आमदार आणि मतदारांनी महायुतीच्या उमेदवारासाठी १०० टक्के प्रामाणिकपणे काम केले. इतकेच नाही तर दुसऱ्या पसंतीची मतेही अपक्ष उमेदवाराला दिली नाहीत.
‘हा निकाल महायुतीसाठी मोठा धक्का’ –
एकीकडे जळगाव जिल्हा शिवसेनेने एवढी इमानदारी दाखवली, तर दुसरीकडे नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार ७० ते ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतो, ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. हा निकाल महायुतीसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे या संपूर्ण प्रकरणावर नक्कीच विचार करतील, अशी अपेक्षा किशोर आप्पा पाटील यांनी शेवटी व्यक्त केली आहे.
नाशिकचा निकाल नेमका काय? –
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत अखेर मोठा उलटफेर पाहायला मिळाला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला आहे. या चुरशीच्या लढतीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी दणदणीत विजय मिळवून महायुतीला जोरदार धक्का दिला. वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून गोकुळ गीते यांनी मतदानापूर्वी माघार घेण्याची घोषणा केली असली, तरी तांत्रिक कारणांमुळे मतपत्रिकेवर त्यांचे नाव कायम होते.
महाविकास आघाडीसह महायुतीमधीलच काही नाराज मतदारांनी अंतर्गत छुपी मदत केल्याने गीते यांनी ७० ते ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मताधिक्य घेत बाजी मारली. या पराभवानंतर पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांनी महायुतीच्याच नेत्यांनी आपला विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप केला आहे, ज्यामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.






