ठाणे, 27 जून: राज्यात उद्या रविवारी (28 जून) होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा सुरू होण्याच्या एक दिवस आधीच प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीच्या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर आता टीईटी परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे राज्यातही मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
भिंवडीतील पोलिसांच्या धाडीतून मोठी माहिती समोर –
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राज्यातील 37 शहरांतील 1,028 परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्यात येणार होती. नीट परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेऊन यावेळी सुरक्षेच्या विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, शनिवारी पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी एका ठिकाणी छापा टाकला. तेथे काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित माहिती असल्याचा संशय आला.
परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर त्यांच्या ताब्यातील काही प्रश्न हे मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांशी जुळत असल्याचे आढळले. त्यानंतर संबंधितांविरुद्ध भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 28 जूनची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला.
उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय –
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) ही इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षक पदांसाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्याकरिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने आयोजित केली जाणारी एक राज्यस्तरीय परीक्षा आहे. दरम्यान, ही परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात होणे आवश्यक असल्याने तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे. परीक्षेबाबतची पुढील सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार –
परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, परीक्षेची नवीन तारीख येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर केली जाईल. राज्यातील सुमारे 6 लाख 126 परीक्षार्थींना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. नव्या तारखेनुसार राज्यातील सर्व 1,028 परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.






