जळगाव, 2 ऑगस्ट: राज्यात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातही पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील पाच दिवस जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
सध्या राज्यातील बहुतांश भागात मान्सून सक्रिय झाला असून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातही ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता असून दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास पावसाच्या सरी हजेरी लावू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
जळगाव जिल्ह्याचा पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज –
2 जुलै (बुधवार) रोजी दुपारनंतर किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
3 जुलै रोजी अंशतः ढगाळ वातावरण राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा मेघगर्जनेसह सरी कोसळू शकतात.
4, 5 आणि 6 जुलै या तीन दिवसांतही अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून जिल्ह्यात विविध भागांत पावसाच्या किंवा मेघगर्जनेसह पावसाच्या एक-दोन सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानात काही प्रमाणात गारवा जाणवेल.
दरम्यान, राज्यातील इतर भागांतही पावसाचा जोर कायम राहणार असून कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, तसेच मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात पावसाची तूट कायम –
यंदा मान्सूनने उशिरा हजेरी लावत जिल्हावासीयांची चांगलीच प्रतीक्षा पाहिली. मात्र, ३० जूनअखेरपर्यंत जळगाव जिल्ह्यासाठी काहीसा दिलासादायक चित्र समोर आले आहे. जून महिन्यात अधिकृत नोंदीनुसार अवघ्या सात दिवस पावसाची नोंद झाली असली, तरी या सात दिवसांतच जून महिन्याच्या सरासरी पर्जन्यमानाच्या तब्बल ६८ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाचा कालावधी कमी असला तरी समाधानकारक पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तथापि, जूनअखेरपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के पावसाची तूट कायम आहे.
पालघर आणि रायगडमध्ये शाळा-महाविद्यालयांना सुट्टी –
कोकणातील पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर पालघरच्या जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना आज सुट्टी जाहीर केली आहे. तसचे रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा: कृषी दिन विशेष: तरुणांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत – ‘आपला बळीराजा’






