ईसा तडवी, प्रतिनिधी
लासगाव (पाचोरा), 22 जुलै: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र नांद्रा यांच्या वतीने लासगाव येथे सर्वसमावेशक आरोग्य तपासणी व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून 150 हून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
डॉ. सुनील गवळी व डॉ. सुहासिनी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. इम्रान खान, आरोग्य सेविका संगीता कावळे आणि आरोग्य सेवक किशोर पाटील यांनी 30 वर्षांवरील नागरिकांची ब्लड शुगर व ब्लड प्रेशर तपासणी केली. यावेळी नागरिकांना संसर्गजन्य तसेच असंसर्गजन्य आजारांविषयी मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व, आजारांचे लवकर निदान आणि योग्य उपचार याबाबतही माहिती देण्यात आली.
दरम्यान, जिल्हा परिषद मराठी शाळेत डॉ. सुहासिनी मोरे यांनी किशोरवयीन मुला-मुलींना पोषक आहार, व्यसनमुक्ती, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया तसेच जलजन्य व कीटकजन्य आजारांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमाला सरपंच मनीषा ज्ञानेश्वर बडगुजर, उपसरपंच वाहिद देशमुख, ग्रामपंचायत सदस्य आनंदा पैठणकर, ग्रामविस्तार अधिकारी प्रशांत पाटील, मुख्याध्यापक वाल्मीक आहिरे, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गटप्रवर्तक योगिता वाणी, आशा वर्कर विद्या धनगर, संगीता धनगर तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले.
‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान म्हणजे काय? –
राज्यात 1 एप्रिल 2026 पासून सुरू झालेल्या या अभियानाचा उद्देश प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण व सहज उपलब्ध आरोग्य सेवा देणे हा आहे. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा बळकट करणे आणि संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे हे यामागील प्रमुख ध्येय आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना “आरोग्य संपन्न ग्राम” पुरस्कार देऊन सकारात्मक स्पर्धा निर्माण केली जाणार आहे. ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पाच ते दोन कोटी रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
गाव पातळीवर नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी, आरोग्यविषयक सामाजिक वर्तणुकीत बदल, व आरोग्यदायी जीवनशैली रुजवण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरणार असून, सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा, सामाजिक प्रबोधन यासह ग्रामीण भागातील विविध घटकांच्या समन्वयाने आरोग्यदायी गाव बनवणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
हेही वाचा: शेतकरी कर्जमाफीची मोठी अपडेट: पहिली लाभार्थी यादी आज जाहीर होणार






