ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 27 जुलै: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नर्मदा स्कूलमध्ये भक्ती, संस्कार आणि भारतीय संस्कृतीचा सुंदर संगम घडविणारा भव्य विठ्ठल-रुक्मिणी दिंडी व पूजन सोहळा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळा परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषाने आणि भक्तिरसाने भारावून गेला.
कार्यक्रमाला नर्मदा स्कूलचे संस्थापक तथा आमदार किशोर आप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी किशोर आप्पा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुनिताताई पाटील, सुमित पाटील तसेच प्रवीण पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणी पूजनाने झाली. किशोर आप्पा पाटील आणि सुनिताताई पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा व महाआरती करण्यात आली. “पांडुरंग हरी, विठ्ठल विठ्ठल” या अखंड नामघोषात विद्यार्थी, शिक्षक व उपस्थितांनी भक्तिभावाने सहभाग नोंदविला.
यानंतर संगीत शिक्षक रितेश भोई यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अभंग, भजन आणि भक्तिगीतांचे सुरेल सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या भावपूर्ण गायनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या भव्य विठ्ठल-रुक्मिणी दिंडीत विद्यार्थ्यांनी विठोबा, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत मीराबाई तसेच वारकरी यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला. ढोल पथकाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात निघालेल्या या दिंडीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला.
यावेळी किशोर आप्पा पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत दिंडीत सहभागी होत त्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. प्रसाद ग्रहण करताना विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी अशा सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा, सामाजिक मूल्ये आणि भक्तीभाव अधिक दृढ होत असल्याचे सांगितले.
या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या राधिका प्रभू, उपप्राचार्य जॉन सर, प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील, जनसंपर्क अधिकारी समाधान पवार, तसेच शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नर्मदा स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भक्तिमय आणि संस्कारमय उपक्रमाचे पालक व नागरिकांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची बीजे रुजविणारे असे उपक्रम सातत्याने राबविले जावेत, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.






