जळगाव, 1 ऑगस्ट: महसूल विभाग हा शासन व जनतेला जोडणारा सर्वात महत्वाचा दुवा आहे, महसूल विभाग सर्वात महत्वाचा असून या विभागाने जनतेच्या अपेक्षांनुसार तत्पर, पारदर्शक काम करावे, कर्तत्वनिष्ठ अधिकारी कर्मचारी हेच महसूल विभागाची खरी ताकद आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
महसूल दिनानिमित्त आयोजित, उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी गुणगौरव कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यलयातील, नियोजन भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील होते.
यावेळी, आमदार नंदकिशोर महाजन, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त आदित्य जीवने, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकार, सर्व उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाअधिकारी, सर्व तहसिलदार, महसूल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजात जळगाव जिल्ह्याने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. महसूल कर्मचाऱ्यांनी नागरिकांचा विश्वास कायम राखून संवेदनशीलतेने सेवा द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नैसर्गिक आपत्ती, पीक नुकसान, टंचाई, अतिवृष्टी, आग, चुकीचे बियाणे आदी सर्व परिस्थितींमध्ये महसूल विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची व डिजिटल प्रणाली प्रभावीपणे वापरण्याची आज गरज असल्याचे त्यांनी सांगीतले. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी समन्वयातून काम केल्यास जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने होतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. शासनात चांगले काम करणा-या अधिकारी कर्मचा-यांची दखल सर्वस्तरावर घेतली जाते, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगीतले.
तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, कोतवाल, पोलीस पाटील, शिपाई, वाहनचालक यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे पालकमंत्री यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

आमदार नंदकिशोर महाजन म्हणाले, शासनात महसूल खाते हे महत्वाचे खाते असून महसूल खात्याला शासनाचा कणा म्हटले जाते. जनतेच्या रोजच्या संपर्कात व जास्त संबंध येणा-या विभाग म्हणजे महसूल विभाग आहे यामध्ये विविध प्रकारचे दाखले, शेतक-यांच्या योजना, आपत्ती व्यवस्थापन आदि कामकाज या विभागाकडे येते. जिल्हयाची महसूल विभागची कामगिरी अतिशय उल्लेखनीय असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. आपल्या जिल्हयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम सुरु असल्याचेही सांगून त्यांनी जिल्हाधिकारी श्री.घुगे यांचे कामाचे कौतुक केले.
आमदार सुरेश भोळे म्हणाले की, शासन व जनता याचा दुवा म्हणून महसूल विभाग काम करतो, त्यामुळे महसूल विभाग महत्वाचा आहे. महसूल विभागाच्या माध्यमातून जनतेची कामे करतांना अधिकारी कर्मचा-यांना कामाच्या माध्यमातून जो आर्शिवाद मिळतो तो फार मोठा असून तो आपल्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असतो. आपण जर सकारात्मक पध्दतीने काम केले तर असा आर्शिवाद आपल्याला निश्चित मिळतो असे त्यांनी यावेळी सांगीतले.

जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले, महसूल विभागाची जबाबदारी केवळ महसूलपुरती मर्यादित नसून इतर विभागांची समन्वयाची कामेही महसूल विभागाला पार पाडावी लागतात. महसूल विभागातील अधिकाऱ्यांसाठी संयम, समन्वय आणि नेतृत्व ही यशाची प्रमुख सूत्रे असल्याचे त्यांनी सांगीतले.
नैसर्गिक आपत्ती, रेड अलर्ट, पंचनामे, SIR यांसारख्या जबाबदाऱ्या सांभाळतानाही नियमित कामकाज प्रभावीपणे पार पाडण्याचे आवाहन त्यांनी सर्व उपस्थित अधिकारी कर्मचा-यांना केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नोकरीसोबत एखादा छंद जोपासावा पुढील काळात जिल्हास्तरावर सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रम आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगीतले.
विविध स्तरावर विविध कामांमध्ये जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्वांनी लोकाभिमुख समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शासन निर्णय, अधिनियम, नियम व परिपत्रकांचा नियमित अभ्यास करून अद्ययावत राहावे, असे आवाहन त्यांनी केले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःचे आरोग्य आणि कुटुंबाकडेही लक्ष द्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
महानगरपालिका आयुक्त श्री.जीवने म्हणाले, महसूल विभागात काम करतांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन कर्मचा-यांनी लोकाभिमुख काम करावे असे सांगून त्यांनी उपस्थितांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्यात,
कार्यक्रमात मान्यवराच्या हस्ते, महसूल विभागात जिल्हयात उत्कृष्ठ काम करणा-या उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, सहायक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसूल सहाययक, पोलिस पाटील, महसूल सेवक, वाहनचालक आदिंचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्री.घुगे, अपर जिल्हाधिकारी श्री.हारकर, शासकीय विधी अधिकारी यांचाही पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, महसूल संघटनेचे पदाधिकारी, प्रतिनिधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अपर जिल्हाधिकारी श्री.हारकर आपल्या प्रास्तविकात म्हणाले, महसूल विभागाने मागील वर्षांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य केले आहे. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाने गेल्या वर्षात केलेल्या महत्वपुर्ण कामांची सविस्तर माहिती दिली. तहसिलदार ज्योती गुंजाळ यानी आभार व्यक्त केले.






