ईसा तडवी, प्रतिनिधी
लासगाव (पाचोरा), 2 ऑगस्ट: महाराष्ट्र पोलीस दलाच्या नुकत्याच झालेल्या भरती प्रक्रियेत पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील जयदीप विजयसिंग खैरनार याची राज्य राखीव पोलीस दल, बल गट क्रमांक १२, वरणगाव येथे, तर भूषण साहेबराव माळी याची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. दरम्यान, निवड झालेल्या या दोघं तरुणांचा नवप्रवर्तक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार प्रतिबंध संघटनेच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत दुसाने यांनी दोन्ही युवकांसह त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या भावी सेवेसाठी शुभेच्छा देत समाजाप्रती निष्ठेने कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते.
जयदीप खैरनार आणि भूषण माळी यांनी कठोर परिश्रम, नियमित शारीरिक सराव आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळविले आहे. एकाच गावातील दोन युवकांची एकाच भरती प्रक्रियेत महाराष्ट्र पोलीस दलात निवड होणे ही लासगावसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
या यशामुळे गावातील स्पर्धा परीक्षा आणि शासकीय सेवेसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना नवी प्रेरणा मिळाली असून, भविष्यात अधिकाधिक युवक शासकीय सेवेकडे वळतील, असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.






