जळगाव, 10 ऑगस्ट: “काशीचा नशामुक्तीचा संदेश जळगावच्या प्रत्येक गावात पोहोचला पाहिजे. विकसित भारताच्या संकल्पनेत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. युवक व्यसनाच्या आहारी गेल्यास त्याचा परिणाम व्यक्ती, कुटुंब आणि समाजाच्या विकासावर होतो. त्यामुळे ‘नशामुक्त युवा, विकसित भारत’ अभियानाला व्यापक जनचळवळीचे स्वरूप देण्यासाठी शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक व धार्मिक संस्था, शैक्षणिक संस्था, पालक आणि नागरिकांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.
‘नशामुक्त युवा–विकसित भारत संकल्प अभियान’अंतर्गत जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत मार्गदर्शन केले.

यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी जी महाराज, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, मनपा आयुक्त आदित्य जीवने, कर्नल श्री. मिनोत्रा, युथ आयकॉन सोनिया देशमुख, माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे यांच्यासह विविध आध्यात्मिक व धार्मिक संस्था, संत-महंत, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनातून सुरू करण्यात आलेल्या ‘नशामुक्त युवा–विकसित भारत’ या राष्ट्रव्यापी अभियानाला जळगाव जिल्ह्यात व्यापक जनचळवळीचे स्वरूप देण्यासाठी आध्यात्मिक संस्था, संत-महंत, लोकप्रतिनिधी, प्रशासन, सेवाभावी संस्था आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक आज येथे पार पडली.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशाची युवा शक्ती सुदृढ आणि व्यसनमुक्त असणे आवश्यक आहे. युवकांचा सहभाग वाढवून गावागावात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करावी. शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखू, गुटखा व अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. काशीमध्ये दिला जाणारा नशामुक्तीचा संदेश जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्ती आणि युवकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
युवकांनी सकारात्मक छंद जोपासावेत – मंत्री संजय सावकारे
युवकांची ऊर्जा सकारात्मक दिशेने वळविण्यासाठी क्रीडा, व्यायाम, वाचन, कला, कौशल्य विकास आणि विविध सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे आवश्यक असून युवकांनी सकारात्मक छंद जोपासावेत, असे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले. मोबाईल, इंटरनेट व सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करावा. देशासाठी बलिदान देणारे सैनिक हेच युवकांचे खरे आदर्श असावेत. व्यसनमुक्ती ही केवळ शासन किंवा पोलिसांची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
समुपदेशन व जनजागृतीवर भर द्यावा – महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी जी महाराज
व्यसनाधीन व्यक्तीला तिरस्काराने दूर न करता प्रेम, आपुलकी आणि मानसिक आधार देऊन समुपदेशन करणे आवश्यक आहे. संत-महंत, कीर्तनकार व प्रवचनकारांच्या माध्यमातून शाळा-महाविद्यालये तसेच गावागावात व्यसनमुक्तीची जनजागृती करावी, असे महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरी जी महाराज यांनी सांगितले.
युवकांची ऊर्जा सकारात्मक दिशेने वळवावी – आमदार सुरेश भोळे
रिकामा वेळ आणि चुकीची संगत युवकांना व्यसनांकडे वळवू शकते. त्यामुळे युवकांनी क्रीडा, शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार, व्यवसाय व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. कुटुंब, समाज आणि प्रशासनाने युवकांना योग्य मार्गदर्शन व सकारात्मक वातावरण उपलब्ध करून द्यावे, असे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.
व्यसनमुक्ती अभियान यशस्वी करण्यासाठी जनजागृती, प्रतिबंध, समुपदेशन आणि पुनर्वसन या चारही स्तरांवर प्रभावीपणे काम करून ‘व्यसनमुक्त जळगाव जिल्हा, विकसित जळगाव जिल्हा’ ही संकल्पना साकार करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी बैठकीत ‘नशामुक्त युवा–विकसित भारत संकल्प अभियाना’संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाची चित्रफीत दाखविण्यात आली. जिल्ह्यात व्यसनमुक्ती अभियान प्रभावीपणे राबविण्यासंदर्भातील नियोजनाचे सादरीकरण युथ आयकॉन सोनिया देशमुख यांनी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘राईस’ या व्यसनमुक्ती कार्यक्रमाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
बैठकीच्या शेवटी उपस्थितांनी व्यसनमुक्ती संदर्भात सामूहिक प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर बैठकीत सहभागी झालेल्या विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक व धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपल्या सूचना व विचार मांडले. यावेळी माय भारत जिल्हा कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.






