मुंबई, 24 ऑक्टोबर : शिवसेना (शिंदे गट) आणि उद्घव ठाकरे गटाचा दसरा मेळावा आज मुंबईमध्ये पार पडत आहे. यंदाचा शिंदे गटाचा मेळावा हा आझाद मैदानावर पार पडत आहे. तर ठाकरे गटाचा मेळावा हा नेहमी प्रमाणे शिवतीर्थावर पार पडत आहे. राज्यभरातून शिवसैनिक मुंबईत दाखल झाले आहे. दोन्ही मेळाव्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे –
भाजप ही पार्टी जिथे जाते तिथे सत्यानाश करते. म्हणून जरांगे पाटलांना सांगतो, त्यांच्यापासून सावध राहा. या भगव्यात दुहीची बीजे त्यांनी रोवली. एक वर्ष होऊन गेले. आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. प्रत्येक वेळी सर्वोच्च न्यायालय त्यांना फटकारत आहे, अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यानिमित्त केली.
रामाने रावणाचा वध केला. शिवभक्त असूनही रावणाला मारावं लागलं. कारण रावण माजला होता. त्याचप्रमाणे आज आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न होतोय. चोरा, पण एक लक्षात घ्या, ज्याप्रमाणे हनुमानाने रावणाची सोन्याची लंका दहन केली होती. तशी तुमची सोन्याची लंका दहन करणाऱ्या धगधगत्या मशाली माझ्यासोबत आहे.
आज देशात खूप प्रश्न आहेत. मी जरांगे पाटलांना धन्यवाद देतोय. अत्यंत समजदारपणाने त्यांनी आंदोलन सुरू ठेवलंय. आज त्यांनी चांगली गोष्ट केली. धनगरांना साद घातली आहे. आताचं सरकार हे डायरचं सरकार आहे. मराठा आंदोलकांवर पाशवी लाठी हल्ला केला. मी मुख्यमंत्री होतो. त्यावेळेलाही हा प्रश्न होता. पण एकावरही लाठीमाराचा आदेश दिला नाही. पोलीस आदेशाचा पालन करतात. ते आदेशाशिवाय चुकीचं वागू शकत नाही. मग हा आदेश कुणी दिला, याची चौकशी नाही.
मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले?
मी जरांगे पाटलांना भेटलो. काश्मीरमध्ये वापरल्या जाणाऱ्या छऱ्याच्या बंदूकी वापरल्या. गद्दारांना म्हणा, तुमच्यात हिंम्मत असेल तर मराठा समाजाला न्याय द्या. हा विषय सोडवायचा असेल तर तो लोकसभेमध्ये सोडवावा लागेल. आम्हाला असं वाटलं होतं, संसदेच्या विशेष अधिवेशनात घेतला जाईल. मराठा समाज, धनगर समाज, सर्वांना न्याय मिळायला हवा. तुम्ही आमच्यावर टीका करा. मी तुम्हाला किंमत देत नाही.
मराठा म्हणजे सगळे मराठी. एका मातीची आपण लेकरं आहोत. पण आपण ज्यांच्याशी लढतो आहोत तो कपटी आहे. तो विघ्नसंतोषी आहे. विना आमंत्रणाचं भाजप लग्नाला जातो. भरपेट जेवतो. सर्व पुरणपोळ्या खाणार. पण निघताना नवरा बायकोत भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जाणार, अशी ही औलाद आहे. भाजपचा कोणत्याही लढ्याशी संबंध नव्हता. स्वातंत्र्यलढा, मराठवाडा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते नव्हते.
तुम्हाला हवं तेव्हा निर्ण लावा. पण जग बघतंय. या हिंदुस्तानामध्ये सर्वोच्च न्यायालय त्याला हा लवाद जुमानत नसेल, तर सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्त्व राहणार आहे की नाही, ही लोकशाही टीकणार की नाही, याकडे आमचं लक्ष आहे. आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा आहे. जो कुटुंब व्यवस्था मानत नाही. त्याने दुसऱ्यांच्या घराण्याबद्दल बोलू नये. पहिलं कुटुंब व्यवस्था मान आणि मग हिंदुत्त्वाचं बोल. कारण कुटुंबव्यवस्था हा हिंदू संस्कृतीचा पाया आहे, तो जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही आमच्यावर बोलणारे कोण आहात. तुम्हाला काहीही अधिकार नाही.
ज्याप्रमाणे मी कोरोनाकाळात माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणून मी राज्यासाठी काम केलं. त्यामुळे मला राज्यातील जनतेच्या मनात स्थान मिळालं, याचा मला अभिमान आहे. घराण्याची परंपरा असते, संस्कार असते. कोण कोणत्या घराण्यातील, त्यावरुन त्याची ओळख ठरते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब यांचेही वडील न्यायाधीश होते.
देशाला एका मजबूत सरकारची गरज आहे. पण एका पक्षाचं पाशवी बहुमत असलेलं सरकार नको, जेव्हा खुर्ची थोडीशी डगमगीत असते. तेव्हा देश मजबूत असतो. नरसिंहराव, मनमोहनसिंग, अटलजी या सर्वांनी चागलं काम केलं. सर्वांना सोबत घेऊन चालणारं सरकार आपल्याला पाहिजे. लाचार असणारे कधी मर्द होऊ शकत नाही.
जेव्हा मला लोकं सांगतात, जनतेमध्ये तुमच्याप्रती प्रेम आहे, पण माझ्यासाठी नको. महाराष्ट्रासाठी ठेवा. सरकार बदलल्यावर यांनी आरेची जागा मेट्रोला दिली. मला सांगा, किती जणांना बुलेट ट्रेनची गरज आहे, मग बुलेट ट्रेन कशाला, गद्दरांना पळवण्यासाठी, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
जो कोणी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू बघेल, त्याच्या शरीराचे तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मग काय करायचं, मुंबई तोडता येत नाही. कारण असं झालं तर महाराष्ट्र तुमचं सरकार जाळून टाकेल. म्हणून मुंबईचा विकास, आता निती आयोगाच्या माध्यमातून होणार. महापालिकेत असं कधीही झालं नाही, पालकमंत्री केला तो ही बिल्डर. त्याने त्याचं कार्यालय महापालिकेत सुरू केलं.
बेधडक भ्रष्टाचार सुरूए. संताप एका गोष्टीचा येतो, ज्या महाराष्ट्राने कोरोना काळात चांगलं काम केलं, त्याकाळात केलेल्या कामाची चौकशी केली जात आहे, त्याला शिंदे सरकार साथ देतंय. कोरोना काळाची चौकशी करायची असेल तर सर्वच मनपाची चौकशी करा, पण पीएम केअरचीसुद्धा चौकशी करा, गंगेतील प्रेतांचीही चौकशी करा. गुजरातमधील प्रेतांचीही चौकशी करा, असे आवाहनही त्यांनी केले.
तुमचे नेते दिल्लीतून थाळ्या वाजवायला सांगत होते, त्यावेळी आमच्या सरकारने 5 रुपयात गोरगरिबांना शिवभोजन थाळी दिली. हे आमचं हिंदुत्व आहे. जेव्हा तुम्ही मंदिरे उघडायला सांगत होते, तेव्हा आम्ही गावागावात आरोग्य मंदिरं उभी केलीत. आम्ही कुणालाही जात विचारलं नाही. पण आम्ही जात न विचारता सर्वांना विचारलं. हे आता धारावीही गिळायला निघाले आहेत. सहज अभ्यास केला तर माझे डोळे पांढरे झाले तर 150 रुपये कोटीचा एफएसआय तिकडे मिळणार आहे.
धारावीचा विकास झालाच पाहिजे. हक्काचं घर मिळालं पाहिजे. पण माझा गिरणी कामगाराच्या मुलाला घर द्या. पोलिसांना घर द्या. मुंबईवरचा मराठी ठसा आम्हाला गडद करायचा आहे. साध्यासुध्या मराठी माणसाला इथं परवडणाऱ्या दरात घर द्या. मुंबई काय धारावीही आम्ही कुणाला गिळू देणार नाही.