जळगाव, 30 मार्च : दिव्यांग मतदारांनी मतदान करून लोकशाहीचा अधिकार वापरला पाहिजे आणि आपली लोकशाही अधिक समावेशक आणि सक्षम बनवली पाहिजे, असे प्रतिपादन नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पीपलचे प्रोजेक्ट मॅनेजर अक्षय जैन यांनी केले. पस्तंभ फाऊंडेशन मनोबल आणि नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसेबल्ड पीपल (NCPEDP) यांच्या संयुक्त विद्यमाने “दिव्यांगांचा राजकारणात व लोकशाहीत सहभाग” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन दीपस्तंभ मनोबल प्रकल्पात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर नायब तहसीलदार प्राजक्ता केदार, यजुर्वेंद्र महाजन, प्रा. डॉ.गणपत धुमाळ उपस्थित होते. दिव्यांग व्यक्तींनी मतदार म्हणून त्यांचे हक्क आणि क्षमता जाणून घेण्याच्या महत्त्वावर जोर देताना राजकीय पक्षांनी अपंग लोकांच्या गरजा समजून घेणे आणि त्यांचा विचार करणे आवश्यक आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी अंदाजे १० करोड अपंग मतदारांच्या मतदानाच्या हक्कांबाबत जागरूकता पसरवण्यासाठी आणि मुख्य प्रवाहातील विकासाच्या प्रयत्नांमध्ये अपंग व्यक्तींना समावेशित करण्यासाठी व्यापक संवाद सुरु करून त्यांनी अलीकडे तयार केलेल्या दिव्यांग जाहीरनाम्यात नमूद केलेल्या प्रमुख मागण्या स्पष्ट करणे, हा या कार्यशाळेचा उद्देश होता.
अक्षय जैन पुढे म्हणाले की, पुर्वी समाजात पुरुषांची संख्या जास्त होती, त्यामुळे सर्व व्यवस्था पुरुषांना केंद्र स्थानी ठेवूनच बनविल्या होत्या, त्याच प्रकारे दिव्यांगांची संख्या जास्त नसल्याने दिव्यांगांच्या सुविधेच्या संदर्भात फार विचार झालाच नाही. सरकार जेव्हा दिव्यांगांना माहिती मागते, तेव्हा माहिती दिली जात नाही, त्यामुळे दिव्यांगांच्या समस्या शासनापर्यंत पोहचत नाही. भारतात 10 करोड दिव्यांग आहेत, पण जिथे निर्णय घेतले जातात, कायदे बनवले जातात तिथे दिव्यांगांची संख्या पर्याप्त नसल्याने त्यांचा आवाज तिथे पर्यंत पोहचत नाही.
दिव्यांगांनी आपली भूमिका बजावावी –
दिव्यांगांच्या समान हक्कांवर भर देत, सर्वसमावेशक निवडणुकांमध्ये भारताच्या अग्रगण्य भूमिकेवर प्रकाश टाकत सर्वसमावेशक निवडणुकीची ताकद ओळखून लोकशाही बळकट करण्यासाठी दिव्यांगांनी आपली भूमिका बजावावी, असे आवाहन दीपस्तंभ फाऊंडेशनचे अध्यक्ष यजुर्वेंद्र महाजन यांनी केले. या कार्यशाळेस जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.