चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव : सध्या उन्हाळा सुरू झाला असून राज्यात सर्वत्र प्रचंड उकाडा जाणवत आहे. अनेक जण उन्हाने हैराण झाले आहे. यामध्ये आता शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात जळगाव जिलह्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली.
गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. कुठे पाऊस, कुठे वादळ तर कुठे प्रचंड ऊन, अशी हवामानाची परिस्थिती महाराष्ट्रात दिसत आहे. यातच आता महाराष्ट्रात शुक्रवारी जळगावात सर्वात जास्त तापमानाची नोंद करण्यात आली. जळगावमध्ये काल 42.7 °C इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी तापमान हे नाशिक येथे होते. नाशिक येथे काल 21.06 °C इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली.
पुढचे तीन दिवस महत्त्वाचे –
आखाती देशातून गुजरातमार्गे मुंबईसह राज्यात वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यात पुढील तीन-चार दिवस उष्णतेची लाट येईल. तसेच कमाल सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंशांनी तापमान अधिक नोंदवले जाईल, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे हवामाना खात्याच्या वतीने सांगण्यात आले आहे.
धुळे, नंदुरबारमध्ये पावसाचा इशारा –
राज्यात एकीकडे उन्हाचा तडाखा जाणवत असताना अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, जळगाव, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पुणे, धुळे, नंदुरबार, बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांमध्येही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. काही ठिकाणी उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला असल्याने त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं किंवा घराबाहेर पडताना उन्हापासून बचावासाठी लागणारं साहित्य सोबत ठेवावं, असेही आवाहन हवामान विभागाने केले आहे.
हेही वाचा – गरजू रूग्णासाठी पीएसआय अमोल गुंडे यांनी केले रक्तदान, काय आहे संपूर्ण बातमी?