भुसावळ (जळगाव), 7 मे : रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीरसभेचे भुसावळात आयोजन करण्यात आले. दरम्यान, या सभेत देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील नेत्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीरसभेत बोलताना म्हणाले की, राहुल गांधींच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी असून त्यांच्या इंजिनला वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे लागले आहेत. मात्र, आपल्या इंजिनला विकासाची डब्बे असून आपली विकासाची गाडी सगळ्यांना सोबत घेऊन चालत आहे. दुसरीकडे त्यांचे फक्त इंजिन आहे आणि प्रत्येक जण त्यावर दावा करतो. त्याठिकाणी डब्बेच नाही. इंजिनमध्ये सामान्य माणसाला बसायला जागा नसते. यांचे इंजिन असे आहे की, तिथे सर्वसामान्यांना बसायला जागा नाहीये. मात्र, मी तुम्ही जर रक्षा ताईंना मतदान केले तर रक्षा खडसे यांचा डब्बा मोदीजींच्या इंजिनला लागेल. आणि विकासाच्या डब्ब्यात सर्वासामान्यांना बसता येईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देशाचा नेता निवडण्याची ही निवडणूक –
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, देशाचा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे. कोण देशाला विकासाकडे नेऊ शकते, ही समजण्याची ही निवडणूक आहे. सामान्यांची इच्छा, अपेक्षा आणि आकांक्षा नेमका कोण पुर्ण करू शकतो. यासाठी ही निवडणूक आहे. रक्षा खडसे यांना निवडून आणायचे तर आहेच मात्र, विकास पुरूष पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी ही निवडणूक आहे.
कोट्यावधी नागरिकांना लाभ –
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासकामाबाबत माहिती दिली. घरकुल योजना, शुद्ध पिण्याचे पाणी, मोफत धान्य, गॅस सिलेंडर, मुद्रा योजना, बचत गट यासाठी असलेल्या योजनांचा लाभ देशातील कोट्यवधी नागरिकांना झाला असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच महिलांना देशाच्या मुख्य धारेमध्ये आणण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. तसेच 2026 नंतर विधानसभा आणि लोकसभेत 33 टक्के महिला खासदार-आमदार असतील, असेही फडणवीस यांनी सांगितले.
मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
मंत्री गिरीश महाजन बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरक्षेच्या बाबतीत खुप पॉवरफुल बनवले असून कुठलाही देश आपल्याकडे वाईट नजरेने बघू शकत नाही आणि विविध शस्त्राची निर्मिती आज भारत करू लागला असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या स्थितीत अमेरिकेसारखा देश पंतप्रधान मोदींना पायघड्या घालत आहेत. हा संपूर्ण बदल मागच्या दहा वर्षात घडून आल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.