सागर (मध्यप्रदेश), 4 ऑगस्ट : संपुर्ण देशभरात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होतोय. दरम्यान, अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे दुर्घटना घडत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील शाहपूर शहरात मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून 9 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 9 निष्पापांचा मृत्यू झाला असून जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांच्यावतीने घटनास्थळी मदतकार्य, बचावकार्य सातत्याने सुरू आहे.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी श्रावण महिन्यानिमित्त शिवलिंगाची निर्मिती करण्यात येत होती. या धार्मिक कार्यक्रमातील शिवलिंगाच्या उभारणीत अनेकांचा सहभाग होता. दरम्यान, यावेळी दुर्दैवीपणे भिंत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकून 9 मुलांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ही घटना आज सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास सागर जिल्ह्यातील शाहपूर शहरातील हरदयाल मंदिरात घडल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मंदिरातील भिंत ही 50 वर्षे जुनी असल्याची देखील माहिती समोर आली आहे. घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये परिसरातून ढीगारा हटवताना नागरिक आणि प्रशासकीय कर्मचारी दिसून येत आहेत. तसेच गावातील अनेक नागरिकांनी देखील बचाव कार्यात सहभाग घेतला.
मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रूपयांची मदत जाहीर –
मध्य प्रदेशचे मंत्री गोविंद राजपूत भिंत कोसळल्याच्या घटनेबाबत बोलताना सांगितले की, दुर्घटनास्थळी प्रशासन वेगाने काम करत आहे. आम्ही सर्व घटनास्थळी उपस्थित असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्यावतीने मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये, तर जखमींच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा : Breaking : पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ तिघांचा बुडून मृत्यू, नेमकं काय घडलं?