जळगाव, 24 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातून नेपाळमधील पशुपतिनाथ येथे दर्शनाला गेलेल्या भाविकांची बस 500 फूट उंचावरुन नदीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत 27 भाविकांचा मृत्यू झाला. दरम्यान, नेपाळ दुर्घटनेतील 25 जणांचे मृतदेह आज जळगाव विमानतळावर आणण्यात आले. यानंतर संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांना सुपूर्द करत रवाना करण्यात आले आहेत.
वायुदलाच्या विशेष विमानाने जळगावात मृतदेह आणले –
नेपाळ दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य आणि पुढील कारवाई लवकरात लवकर व्हावी, यासाठी काल जिल्हा प्रशासनाच्यावतीने युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात होते. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह आमदार संजय सावकारे ह्या काल रात्रीच जळगावरून रात्री उशिराने मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. यानंतर आज सकाळी त्या नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचत सर्व माहिती घेतली.
वरणगावच्या दिशेने मृतदेह रवाना –
नेपाळ मध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या जळगांव जिल्ह्यातील नागरिकांचे 25 पार्थिव घेऊन भारतीय वायु दलाच्या विमान सायंकाळी रवाना झाले होते. दरम्यान, नेपाळ दुर्घटनेतील 25 जणांचे मृतदेह आता रात्री जळगाव विमानतळावर वायुदलाच्या विशेष विमानाने आणले. संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांना सुपूर्द केले. यानंतर अॅम्बुलन्सने ते मृतदेह वरणगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
दुर्देवी दुर्घटनेत मृत्यू पडलेल्या व्यक्तींची नावे आणि त्यांची गावे –
प्रकाश नथ्थू कोळी (सुखडे), तळवेल. रोहिणी सुधाकर जावळे, वरणगाव. पल्लवी संदिप सरोदे, वरणगाव, अनिता अविनाश पाटील दर्यापूर. सरोज मनोज भिरुड, जळगाव/तळवेल, सुलभा पाडुरंग भारंबे, भुसावळ. गणेश पाडुरंग भारंबे, भुसावळ. मिनल गणेश भांरबे, भुसावळ. परी गणेश भारंबे, भुसावळ. विजया कडू जावळे, वरणगाव. निलिमा चंद्रकांत जावळे, वरणगाव. संदिप राजाराम सरोदे, वरणगाव. तुळशिराम बुधा तायडे, तळवेल. सुहास प्रभाकर राणे, तळवेल. निलिमा सुनिल धांडे, भुसावळ. भारती प्रकाश जावळे, वरणगाव, सागर तडु जावळे, वरणगाव. आशा समाधान बाविस्कर, तळवेल. सरला तुळशिराम तायडे, तळवेल. अनुप हेमराज सरोदे, सरला सुहास राणे, तळवेल. पंकज भागवत भंगाळे, वरणगाव. मंगला विलास राणे, तळवेल. रिंकु चंदना सुहास राणे, तळवेल. सुधाकर बळीराम जावळे, वरणगाव.
जळगाव विमानतळावर यांची होती उपस्थिती –
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ. सुरेश ( राजूमामा ) भोळे आ. संजय सावकारे,आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कस्टम विभागाचे अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, संबंधित अधिकारी, उपस्थित होते.
नेपाळ बस अपघात दुर्घटना –
नेपाळमधील पशुपतीनाथ येथे दर्शनासाठी गेलेल्या पर्यटकांची बस तनहू जिल्ह्यातील मार्सयागडी नदीत कोसळल्याने 27 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 16 पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर काठमांडूसह तनहू रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये काहीजण जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव, पिंपळगाव तळवेल, गाळेगाव मधील आहेत. यानंतर जळगाव जिल्हा प्रशासनच्यावतीने दिल्ली तसेच नेपाळ सरकारमधील अधिकाऱ्यांसोबत संपर्क करण्यात आला. याबाबतची माहिती त्याठिकाणाहून घेण्यात आली होती.
हेही वाचा : भुसावळमधील भाविकांसोबत दुर्दैवी घटना, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे नेपाळमध्ये दाखल