नवी दिल्ली, 4 मे: देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून भारतीय जनता पक्षाने (भाजप) तीन राज्यांत सत्ता मिळवत आपली ताकद अधिक मजबूत केली आहे. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपने मोठा विजय मिळवला असून एकूणच या निकालामुळे भाजपचे देशातील वर्चस्व वाढल्याचे दिसत आहे.
तर दुसरीकडे तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत पारंपरिक द्रमुक-एआयएडीएमके समीकरण मोडीत काढले आहे. केरळमध्ये काँग्रेस आघाडीला सत्ता मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय –
पश्चिम बंगालमध्ये यावेळी भाजपने जबरदस्त कामगिरी करत बहुमताचा टप्पा सहज पार केला आहे. सुमारे 293 जागांपैकी भाजप 208 जागांवर आघाडी मिळवत विजय निश्चित केला. तर तृणमूल काँग्रेसला 80 जागापर्यंत मजल मारता आलेली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील विजय हा भाजपसाठी ऐतिहासिक मानला जात असून भाजपने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा गड उद्ध्वस्त केला. या निकालामुळे बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आसाममध्ये भाजपची विजयाची हॅट्रिक –
आसाममध्ये भाजपने पुन्हा एकदा सत्ता टिकवली आहे. सुमारे १२६ जागांपैकी 102 जागांवर आघाडी प्राप्त करत बहुमताचा आकडा ओलांडला. तर काँग्रेसला 19 जागा मिळाल्या असून विरोधकांना येथे अपेक्षित कामगिरी करता आली नाही. राज्यातील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि संघटनशक्तीच्या जोरावर भाजपने सलग विजय मिळवला असल्याचे सांगितले जात आहे.
केरळमध्ये काँग्रेस आघाडीचा कमबॅक –
केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF आघाडीने बहुमत मिळवत डाव्या आघाडीला सत्तेबाहेर केले आहे. १४० सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी ७१ जागांची गरज असताना काँग्रेस आघाडीने 102 जागांवर विजय मिळवत हा आकडा पार केला आहे. हा निकाल काँग्रेससाठी मोठा राजकीय दिलासा मानला जात आहे.
तामिळनाडूत अभिनेता विजय थलपती ठरला किंगमेकर –
तामिळनाडूत सर्वात मोठा राजकीय उलथापालथ झाली आहे. अभिनेता विजय थलपती यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने 234 पैकी तब्बल 107 जागांवर आघाडी घेत मोठी झेप घेतली आहे. DMK आणि AIADMK या पारंपरिक पक्षांना मागे टाकत TVKने पहिल्याच निवडणुकीत दमदार कामगिरी केली आहे. अनेक ठिकाणी TVK उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.
पुदुच्चेरीत भाजप आघाडीचा प्रभाव कायम –
पुदुच्चेरीत भाजप समर्थित आघाडीने चांगली कामगिरी करत सत्ता कायम ठेवली आहे. मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांनी स्वतःच्या मतदारसंघात विजय मिळवला आहे.
३० सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी 16 जागांची आवश्यकता असताना एनडीए आघाडीने 18 हून जागांवर विजय मिळवत हा आकडा गाठल्याचे दिसत आहे.
दरम्यान, देशातील पाच राज्यात झालेल्या या विधानसभांच्या निवडणुकीत एकीकडे भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील वर्चस्व अधिक बळकट झाले, तर दुसरीकडे तामिळनाडूत विजय यांच्या TVKच्या रूपाने नव्या राजकीय शक्तीचा उदय झाला आहे.
VIDEO | Farmers News : बांधावरची शेती | आदर्श शेतकरी सुनिल पाटील यांचा अनोखा प्रयोग






