मुंबई, 12 मे : भारताचा दिग्गज फलंदाज विरोट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची माहिती समोर आली आहे. माजी कर्णधार रोहित शर्माने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. दरम्यान, रोहित पाठोपाठ विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेतल्याने भारतीय क्रिकेट संघासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतला संन्यास –
भारतीय क्रिकेट संघाची पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्याला सुरूवात होत असताना विरोट कोहलीने मोठा निर्णय घेतलाय. इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे कसोटीतून निवृत्तीची घोषणा केलीय. विराट कोहलीनेही क्रिकेटच्या सर्वात जुन्या फॉरमॅटला निरोप दिला असून या दिग्गज फलंदाजाच्या 14 वर्षांच्या प्रदीर्घ युगाचा अंत झाला आहे.
टीम इंडियाला मोठा धक्का –
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटलं होतं. दरम्यान, रोहितच्या निवृत्तीच्या अगदी पाच दिवसांनंतरच विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले आहे. एकीकडे रोहित शर्मा निवृत्त झाला असताना विराट कोहलीने देखील रोहित पाठोपाठ निवृत्तीचा निर्णय घेतला. यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय.
विराटनं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? –
विराट कोहलीनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. या पोस्टमध्ये विराटनं म्हटलंय की, कसोटी क्रिकेटमध्ये ‘बॅगी ब्लू’ (भारताची टोपी) प्रथमच परिधान करून आज 14 वर्षे झाली आहेत. खरंतर, हा फॉरमॅट मला कुठे घेऊन जाईल, याची कल्पनाही नव्हती. मात्र, या फॉरमॅटने माझी परीक्षा घेतली तसेच मला घडवले आणि आणि आयुष्यभर पुरतील अशा अनेक गोष्टी शिकवल्या.
भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याला हृदयात वेगळे स्थान असते. कसोटी क्रिकेट म्हणजे परीक्षा घेणारा, दीर्घ आणि संघर्ष पाहणारा फॉरमॅट असून हा फॉरमॅट तुम्हाला अगदी छोट्या छोट्या क्षणांचा आनंद देतो, जो आयुष्यभरासाठी आठवणी म्हणून सोबत असतो.
या फॉरमॅटपासून दूर जाणं सोपं नाहीये. पण हा निर्णय आता योग्य वाटतोय. मी कसोटी क्रिकेटला माझं सर्वस्व दिले. पण त्यापेक्षा कितीतरी पट जास्त; अगदी माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त या खेळाने मला परत दिले आहे.
मी कृतज्ञतेने भरलेल्या मनाने निवृत्त होत असून या खेळासाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी, मला समजून घेणाऱ्यांसाठी आणि साथ देणाऱ्यांसाठी माझं मन कृतज्ञतेने भरून आले आहे. माझ्या मनात फक्त आणि फक्त कृतज्ञताच आहे.
दरम्यान, मी माझ्या कसोटी कारकिर्दीकडे नेहमीच हसतमुखाने पाहीन!
#269, साइनिंग ऑफ.
हेही वाचा : राज्यात पुढील चार दिवस पावसाचे; जळगाव जिल्ह्याचा नेमका हवामान अंदाज काय?