चौगाव (चोपडा), 15 मे: चौगाव किल्ला हा जळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि निसर्ग पर्यटनाचा महत्त्वाचा ठेवा मानला जातो. चोपडा शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेला हा जिल्ह्यातील एकमेव सुस्थितीत असलेला डोंगरी किल्ला आहे. बाराव्या शतकात अहिर राज्यांच्या काळात भैरव घाटावर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे सत्तावीस एकर क्षेत्रात या किल्ल्याची उभारणी करण्यात आली होती. किल्ल्यावर शालीवाहन काळातील लेण्या, एकाच दगडात कोरलेला सप्ततलाव समूह, दहा गुंठे परिसरातील गवळी वाडा, दोन प्रवेशद्वारे, मजबूत तटबंदी तसेच नुकतेच पायथ्याशी सापडलेले हेमाडपंथी मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. याशिवाय राणीकाजल माता समाधी, अन्य समाधीस्थळे, जिल्ह्यातील सर्वात उंच धबधबा, त्रिवेणी महादेव मंदिर आणि तीन नाल्यांचा त्रिवेणी संगम यामुळे या परिसराला ऐतिहासिक, धार्मिक, वन आणि निसर्ग पर्यटनाचे महत्त्व प्राप्त झाले आहे.
पावसाळ्यापुर्वी दुरूस्तीची मागणी –
दरवर्षी जून महिन्यापासून येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. मात्र, मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे चौगाव ते किल्ला या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे. यासोबतच किल्ला परिसरात बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी, पर्यटकांसाठी निवास व्यवस्था, स्वच्छतागृहे, किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या, रेलिंग आणि प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. तसेच क्षतिग्रस्त मंदिर, तटबंदी, प्रवेशद्वार, गवळी वाडा आणि इतर ऐतिहासिक अवशेषांचे संवर्धन व दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे मत इतिहासप्रेमी आणि पर्यटकांकडून व्यक्त केले जात आहे.
घनदाट जंगल, समृद्ध जैवविविधता, विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि औषधी वनस्पतींनी नटलेला हा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या नैसर्गिक संपत्तीचे जतन करणे आवश्यक असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले आहे. इतर किल्ल्यांप्रमाणे चौगाव किल्ल्यावरही अवैध अतिक्रमण, ऐतिहासिक अवशेषांची नासधूस आणि अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून होत आहे.






