नवी दिल्ली, 9 मे : पाकिस्तानने 8 ते 9 मे रोजीच्या मध्यरात्री सैन्याला लक्ष्य बनवत भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले. यासोबतच पाकिस्तान सैन्याने नियंत्रण रेषेवर मोठ्या क्षमतेच्या हत्यारासह गोळीबार केला. तसेच आंतरराष्ट्रीय सीमारेषा तसेच नियंत्रण रेषेवरील लेहपासून सत्रिकपर्यंत 300 ते 400 ड्रोनद्वारे 36 ठिकाणी हल्ला करत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परिणामी, भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानी सैन्याला मोठं नुकसान पोहचवण्याचं काम करण्यात आले असल्याची माहिती कर्नल सोफिया यांनी दिली.
कर्नल सोफिया काय म्हणाल्या? –
परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत कर्नल सोफिया बोलत होत्या. सोफिया पुढे म्हणाल्या की, पाकिस्तानने सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत 400 ड्रोनच्या सहाय्याने भारतात 36 ठिकाणी हल्ले केले. त्यापैकी बहुतांश ड्रोन भारतीय सेनेने हाणून पाडत बहुतेक ड्रोन नष्ट केले. पाकिस्तानकडून वापरण्यात आलेले ड्रोन हे तुर्कीचे होते. दरम्यान, पाकिस्तानचे बेजाबदार वर्तन पुन्हा एकदा समोर आले असल्याचेही कर्नल सोफिया म्हणाल्या.
भारताचे प्रत्युत्तरात पाकिस्तानमध्ये चार हवाई रक्षण यंत्रणांवर हल्ले –
पाकिस्तानच्या सशस्त्र युएव्हीने भंटिडा सैन्य तलाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्क्रिय करण्यात आला. उरी, पुंछ, राजौरी, उधमपूर यासह इतर ठिकाणी ड्रोन आणि गोळीबारी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला असून यामध्ये भारतीय सैन्याचे काही जवान जखमी झाले. दरम्यान, पाकच्या ड्रोन हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानमध्ये चार हवाई रक्षण यंत्रणांवर हल्ले करण्यात आले. यामध्ये त्यात एक यंत्रणा उद्धवस्त करण्यात आल्याची माहिती कर्नल सोफिया यांनी दिली.
नागरी विमानांचा ढाल म्हणून केला जातोय वापर –
कर्नल सोफिया पुढे म्हणाल्या की, पाकिस्तानने भारताची वायू हद्द ओलांडली असता भारताकडून चार ड्रोनच्या माध्यमातून प्रतिहल्ला करण्यात आले. मात्र, पाकिस्तानने साडे आठ वाजता ड्रोन आणि मिसाईल हल्ला केल्यानंतरही नागरी हवाई क्षेत्र बंद केले नाही. तसेच ते नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर करत आहेत.
पाकिस्तानचा मुद्दा आंतरराष्ट्रीय मंचांवर उपस्थित करू –
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. भारत शांततेचा पुरस्कर्ता असला, तरी अशा शत्रुत्वाच्या कृतींना उत्तर द्यायला तो कमी नाही. आम्ही हा विषय संयुक्त राष्ट्रसंघासह इतर आंतरराष्ट्रीय मंचांवर उपस्थित करू, असे मिस्त्री म्हणाले आहेत.
हेही वाचा : मोठी बातमी! पाकिस्तानच्या गोळीबारात मुंबईचा जवान शहीद; मुरली नाईक यांना सीमेवर वीरमरण