चाळीसगाव, 6 ऑक्टोबर : मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामविकास व जलसंधारणाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा खु. (ता. चाळीसगाव) ग्रामपंचायतीत महिला, बालिका पंचायत तसेच ग्रामस्थांच्या सक्रीय सहभागातून “वनराई बंधारा” बांधकामाचे कार्य उत्साहात पार पडले.
सीईओ मिनल करनवाल यांच्यातर्फे सत्कार –
जळगाव जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्यास चाळीसगाव तालुक्यातून सुरुवात झाली आहे. दरम्यान, या कौतुकास्पद कामगिरी बद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी गटविकास अधिकारी अन्सार शेख यांच्यासह बोरखेडा येथील सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना विशेष आमंत्रित करून सत्कार केला.
बोरखेडा ग्रामपंचायत हद्दीतील बोरखेडा शिवारातील कोल्हया नाल्यावर 5 ऑक्टोबर 2025 रोजी श्रमदानाच्या माध्यमातून हा बंधारा उभारण्यात आला. या कार्यात सरपंच वंदना गुलाब पाटील, उपसरपंच मोहिनी संदीप चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव नाना पाटील, पोलीस पाटील शरद धर्मा पाटील, ग्रामपंचायत अधिकारी सविता पांडे, अंगणवाडी सेविका कलाताई निकम, आशा सेविका चंद्रकला सोनवणे, महिला बचतगट सी.आर.पी. सौ. अनिता चव्हाण यांच्यासह महिला बचतगटातील सर्व महिला, युवक मंडळ सदस्य व ग्रामस्थ यांनी एकजुटीने श्रमदान केले.
ग्रामस्थांच्या स्वयंप्रेरणा आणि लोकसहभागातून कार्य यशस्वीरित्या पूर्ण –
या उपक्रमामुळे परिसरातील जलसंधारण कार्याला चालना मिळून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याचा लाभ होणार असून भूजलपातळी वाढण्यास मदत होईल. विशेष म्हणजे, या बंधाऱ्याच्या बांधकामासाठी कोणताही शासकीय निधी न वापरता ग्रामस्थांच्या स्वयंप्रेरणा आणि लोकसहभागातून हे कार्य यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. हा उपक्रम “मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान” अंतर्गत ग्रामस्थांच्या एकजुटीचे आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण ठरला आहे.
बंधारा भविष्यात गावाच्या जलसाठ्याचा ठरणार आधारस्तंभ –
चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा खु. येथे वनराई बंधाऱ्याच्या बांधकामात ग्रामस्थांनी लोकसहभागातून योगदान दिल्याने जलसंवर्धनाबाबत जनजागृती झाली आहे. गावकऱ्यांच्या श्रमदानातून उभारलेला हा बंधारा भविष्यात गावाच्या जलसाठ्याचा आधारस्तंभ ठरणार आहे. मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत उभारलेले असे उपक्रम ग्रामीण विकास आणि स्वावलंबनाचे उत्तम उदाहरण आहेत.
वनराई बंधाऱ्याचे फायदे –
- वनराई बंधाऱ्यामुळे पाणी अडवून मातीची धूप थांबते.
- पावसाचे पाणी वाया न जाता भूजलसाठ्यात वाढ होते.
- शेतीत पिकांचे दुबार उत्पादन शक्य होते.
- शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावतो.
- ग्रामीण भागातील जलस्रोत टिकवण्यासाठी तसेच दुष्काळी परिस्थिती टाळण्यासाठी वनराई बंधारे महत्त्वाची भूमिका बजावतात.