पाचोरा, 14 जुलै: वाढता उत्पादन खर्च आणि घटती उत्पादकता या दुहेरी संकटाचा सामना करणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने आता नव्या तंत्रज्ञानाची कास धरली आहे. पारंपरिक लागवड पद्धतीला पर्याय म्हणून कमी अंतरावरील घनलागवडीचा प्रसार करण्यासाठी राज्यभर ‘कापूस क्रांती’ अर्थात कापूस उत्पादकता अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील निवडक १६ जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या या उपक्रमाला पाचोरा तालुक्यातही चांगला प्रतिसाद मिळाला असून, १२८ शेतकरी गटांनी १,२८० हेक्टर क्षेत्रावर घनलागवडीचा प्रयोग राबविला आहे.
कृषी विभागाचे कापूस उत्पादकता अभियान –
पारंपरिक पद्धतीत कापसाची लागवड ४ बाय ४ किंवा २ बाय २ फुटांच्या अंतरावर केली जाते. मात्र, या अभियानात सुमारे ३ फूट × १. 0 फूट अंतरावर घनलागवड (Closer Spacing) करण्यावर भर देण्यात आला आहे. कमी अंतरामुळे प्रति एकर झाडांची संख्या वाढते आणि योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादनातही वाढ होण्याची अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
या अभियानांतर्गत आत्मा (ATMA) अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गट, महिला बचत गट तसेच पाणी फाउंडेशनशी संलग्न गटांना प्राधान्याने सहभागी करून घेण्यात आले. महाडीबीटी पोर्टलवर पात्र ठरलेल्या गटांना कृषी विभागामार्फत विनामूल्य कापूस बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
पाचोरा तालुक्यात 1 हजार 280 हेक्टरवर प्रयोग –
कृषी विभागाने हाती घेतलेल्या या प्रकल्पामध्ये प्रत्येक गटासाठी २५ एकर (१० हेक्टर) क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. पाचोरा तालुक्यात एकूण १२८ शेतकरी गटांना बियाण्यांचे वितरण करण्यात आले असून, १,२८० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. जून महिन्यात, विशेषतः 23 व 24 जूनच्या सुमारास बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
View this post on Instagram
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून मार्गदर्शन –
कृषी विभाग या अभियानात फक्त बियाणे वाटपावर न थांबता संपूर्ण हंगामभर शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणार आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, उत्पादन खर्च कमी करणे, रासायनिक खतांचा वापर नियंत्रित ठेवणे आणि उत्पादन वाढविणे, ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष शेतभेट –
पहिल्या पावसानंतर कापसाची उगवण समाधानकारक झाल्याचे पाहण्यासाठी कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतभेटी सुरू केल्या आहेत. जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, उपविभागीय कृषी अधिकारी किशोर मांडगे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर कराड तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचोरा तालुक्यातील लासगाव, खेडगाव तसेच तारखेडा येथे भेट देऊन लागवडीची पाहणी केली.
“कापूस उत्पादकता अभियानांतर्गत कमी अंतरावरील घनलागवडीला पाचोरा तालुक्यात शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लासगाव, सामनेर, खेडगाव, तारखेडा आदी गावांमध्ये प्रत्यक्ष क्षेत्रभेटी घेऊन पिकांची पाहणी करण्यात आली आहे. या पद्धतीमुळे प्रति एकर झाडांची संख्या वाढून उत्पादनवाढीस मदत होण्याची अपेक्षा आहे. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामात वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन, पिकांची पाहणी आणि योग्य व्यवस्थापनाबाबत सल्ला दिला जाणार आहे.”
– सुधाकर कराड (तालुका कृषी अधिकारी, पाचोरा)
यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत घनलागवडीमुळे उत्पादनात कशी वाढ होऊ शकते, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सुरुवातीच्या टप्प्यात रासायनिक फवारण्यांऐवजी दोन फवारण्या लिंबोळी अर्काच्या आणि एक फवारणी दशपर्णी अर्काची करण्याचा सल्ला दिला. या भेटीत प्रगतिशील शेतकरी तसेच मंडळ कृषी अधिकारी आणि कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
बदलत्या शेतीकडे एक महत्त्वाचे पाऊल –
कापूस उत्पादन वाढविण्यासोबतच शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे ठरत आहे. कमी अंतरावरील घन लागवड, तांत्रिक मार्गदर्शन आणि नैसर्गिक उपायांवर भर या माध्यमातून कापूस शेती अधिक फायदेशीर करण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न असून आगामी काळात या अभियानाचे परिणाम उत्पादनाच्या आकडेवारीतही दिसून येतील, अशी अपेक्षा कृषी विभागाकडून तसेच शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
हेही वाचा: महावितरणच्या कारभारावर नागरिकांचा संताप; पाचोरा-भडगावातील आढावा बैठकीत प्रश्नांचा भडिमार






