ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 12 जून : पाचोरा तालुक्यातील बांबरूड राणीचे येथे काल रात्री साडे सात ते आठ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काल रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच जोरदार वाऱ्याच्या झोतामुळे अनेक केळी तसेच मोसंबीची बाग जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
नुकसानीचा पंचनामा –
पाचोरा तालुक्यातील बांबरूड राणीचे येथे केळी तसेच मोसंबी बागांचे वादळी पावसामुळे अतोनात नुकसान झाले. वर्षभर मेहनत घेऊन फुलवलेल्या बागेचे अचानक आलेल्या पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय. दरम्यान, प्रशासनाच्यावतीने आज बांबरूड परिसरात झालेल्या नुकसानीचा पंचानामा करण्यात आला असून त्याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे.
पाचोऱ्याचे तहसीलदार विजय बनसोडे यांच्या उपस्थिती नुकसानग्रस्त भागाचा पंचानामा करण्यात आला. यावेळी तलाठी प्रियंका पाटील, उपसरपंच प्रदीप वाघ तसेच पोलीस पाटील भूषण बडगुजर आदी उपस्थित होते. तत्पुर्वी, पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ तसेच पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांनी देखील बांबरूडमध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची आज पाहणी केली.
मयुर वाघ यांच्या शेतातील मोसंबीचे नुकसान –
पाचोरा तालुक्यातील प्रगतशील शेतकरी मयुर वाघ हे त्यांच्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करतात. दरम्यान, काल झालेल्या वादळी पावसामुळे मुयर वाघ यांच्या पाच एकर शेतातील मोसंबीची लागवड केली होती. दरम्यान, पाच एकरातील मोसंबी बागेचे 50 टक्क्याहून अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाच्यावतीने आज पंचानामा करण्यात आला असून शासनाने तात्काळ नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी मयुर वाघ यांनी केलीय.