ठाणे, 12 जानेवारी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपून राज्यात नवे सरकार स्थापन झाले असतानाही राजकीय वातावरण तापले असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने घेण्यात आलेल्या भूमिकांवरुन देखील चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमासाठी ठाण्यात आले असता त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाविकास आघाडीतील पक्ष हे स्वार्थासाठी एकत्र आले होते. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये खोटे नरेटिव्ह पसरवून लोकांची दिशाभूल करुन मते घेतली आणि मते मिळाल्यानंतर ज्यांनी मतदान केलंय त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला. यामुळे विधानसभा निवडणुकीत लोकांनी त्यांना जागा दाखवली. महायुती सरकारमध्ये अडीच वर्ष मी मुख्यमंत्री असताना मला फक्त रोज आरोप- शिव्या दिल्या. याशिवाय दुसरे काही दिले नाही.
उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला –
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते. त्यांच्यावर खालच्या स्तरावर आरोप करत त्यांना जेलमध्ये टाकण्याचे कारस्थान केले. तु तर राहशील नाहीतर मी राहील म्हटले. अजून ते काय-काय म्हटले याबाबत मी जास्त बोलू शकत नाही, असे त्यांनी शब्द वापरले. दरम्यान, आता काय-काय बदल झाले आणि काय जादू झाली. ज्यामुळे सरडे जसे रंग बदलतात. त्यापेक्षाही ते एवढ्या फास्ट रंग बदलताएत, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला आहे.
आरोपी कितीही मोठा असला तरी त्याला सोडणार नाही – एकनाथ शिंदे
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावर बोलतना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बीड प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सीआयडी-एसआयटी चौकशी लावली आहे. आरोपींवर मोक्का लावलेला आहे. आरोपींना अटक झालेली आहे. संतोष देशमुख खून प्रकरण हे दुर्दैवी असून अतिशय निर्घृणपणे त्यांचा खून करण्यात आला आहे. अशा लोकांना चुकीला माफी नाही. त्यांना कुणालाही क्षमा केली जाणार नाही. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. या खून प्रकरणात संबंधित आरोपींपैकी एकालाही सोडले जाणार नाही.
दरम्यान, संतोष देखमुख हत्याप्रकरणातील या आरोपींना फासावर लटकवेपर्यंत सरकार न्यायालयात बाजू लावून धरेल. या प्रकरणात विशेष वकील नेमले असून फास्ट्रॅकवर हे प्रकरण चालेल. या प्रकरणात सरकार पुर्णपणे गंभीर असून आवश्यक त्या बाबी करण्यासाठी सरकार तसेच मुख्यमंत्र्यांनी योग्य ती पावले उचलली आहेत. संतोष देशमुखला न्याय मिळेपर्यंत आणि आरोपींना फासावर लटकेपर्यंत सरकार देशमुख यांच्या कुटुंबियांच्या पुर्णपणे पाठीशी असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : Accident News : टिप्परनं घेतला सरपंचाचा जीव, भीषण अपघातात जागीच मृत्यू