नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाल्याने 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. दरम्यान, गाड्यांच्या नावामुळे घोळ झाला अन् ऐनवळी फलाट बदलल्याने गर्दी उसळून आली. यातच चेंगराचेंगरी झाल्याचे प्रमुख कारण समोर आले आहे.
चेंगराचेंगरीचे कारण नेमकं काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ सुरू आहे. यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक महाकुंभात हजेरी लावत आहेत. असे असताना महाकुंभकडे जाणाऱ्या सर्वच गाड्यांची नावे प्रयागराजने सुरू होतात. या पार्श्वभूमीवर दिल्ली रेल्वे स्टेशनवर फलाट 14 वर प्रयागराज एक्स्प्रेस थांबलेली होती.
मात्र, याचवेळी ‘प्रयागराज स्पेशल’ या ट्रेनची घोषणा करण्यात आली. ही गाडी फलाट 16 वर लागणार असे सांगण्यात आले असतानाच फलाट क्र. 14 व फलाट क्र. 16 वरील प्रवासी गोंधळले आणि परस्परांच्या विरुद्ध दिशेने पळत सुटले. यावेळी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. आणि यामुळे 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे प्रमुख कारण सांगितले जात आहे.दिल्ली रेल्वे स्टेशन चेंगराचेंगरी घटना –
नवी दिल्ली स्टेशनवरुन प्रयागराजला जाणारी गाडी पकडण्यासाठी गर्दी उसळली. त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाल्याने स्टेशनवरील प्रवासी एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघाले. यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 16 जवळील एस्केलेटरजवळ चेंगराचेंगरी झाली. दरम्यान, यामध्ये आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला. तर 20 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. यावेळी घटनेतील जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. मृताच्या नातेवाईकांना मदत –
दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये तर गंभीर जखमींना प्रत्येकी अडीच लाख रुपये मदतीची घोषणा करण्यात आलीय. यासोबतच किरकोळ जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये दिले जातील. तसेच बिहार सरकारच्यावतीने रोख मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत