जळगाव, 7 सप्टेंबर : राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीकविमा योजना राबवली जात असून पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीकपेरा बंधनकारक आहे. म्हणून ज्या शेतकऱ्यांना पीक पेरा नोंदविला नाही त्यांच्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने ई-पीक पाहणीसाठी मुदतवाढ दिली आहे.
आतापर्यंत इतक्या शेतकऱ्यांची पीक पाहणी –
जळगाव जिल्ह्यात 6 लाख 96 हजार 618 खातेदार शेतकरी आहेत. यापैकी अद्याप 2 लाख 2 हजार 710 म्हणजे 32.27 टक्के शेतकऱ्यांनीच पीकपेरा नोंदवलेला आहे. अद्याप 67.73 टक्के शेतकऱ्यांनी पीक पेरा नोंदविला नसल्याने ई-पीक पाहणीसाठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत ई-पीक पाहणी करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे .
पीकपेऱ्यासाठी मुदतवाढ –
शेतकऱ्यांना ‘आपल्या शेतात पीक पाहणी’ या मोबाईल पद्वारे पीकपेरा नोंदवता येतो. यासाठी शेतकऱ्यांना शेतातील विविध पिकांची आपल्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत होती. मात्र, मागील काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता आली नाही. यामुळे आता या ई-पीक पाहणीसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे पीक विम्यासाठी असलेली ई-पीक पाहणी शेतकऱ्यांना पूर्ण करता येणार आहे.
शेतकऱ्यांना येत होत्या अडचणी –
पीक शेतात आहे की नाही याची पडताळणी करण्यासाठी ई-पीक पाहणी करणे गरजेचे असते. पण ही पाहणी करताना ई-पीक पाहणीचे सर्व्हर डाऊन असणे, अपलोड न होणे, अंतिम अहवाल न येणे अशा अडचणी येत होत्या. यामुळे अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता आली नसल्याच्या तक्रारी प्रशासनानाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीची संधी मिळणार आहे.
विविध योजनांचा लाभ –
यावर्षी राज्य शासनाने १ रुपयात पीकविमा उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा भरला आहे. आता विम्याचा लाभ मिळण्यासाठी जे पीक विमा करताना नोंदवले आहे. त्यांना पिकाची ई-पीक पाहणीमध्ये नोंद होणे गरजेचे आहे. पीक पाहणी नोंदणी पूर्ण करून घ्यावी व शासनाच्या विविध योजना ज्यामध्ये पीक बिमा,पीक कर्ज,शासकीय अनुदान, अतिवृष्टी अनुदान इत्यादी विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे.