पुणे, 16 जून : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कुंडमळा येथे रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून अनेक पर्यटक वाहून गेले होते. यापैकी चार पर्यटकांचा मृत्यू असून 51 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काल सायंकाळी उशिरापर्यंत एनडीआरएफ तसेच स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य राबविण्यात आलं होतं. आज सकाळी पुन्हा बचावकार्य हाती घेण्यात आलंय.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर असणाऱ्या कुंडमळा पूल कोसळून रविवारी अनेक पर्यटक वाहून गेले होते. काल रविवारी सुटीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात याठिकाणी पर्यटकांची गर्दी होती. दरम्यान, एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पर्यटक पुलावर आल्याने हा पूल कोसळला. हा पूल कोसळला तेव्हा याठिकाणी तब्बल 100 पर्यटक उपस्थित असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (NDRF) कालच्या बचावकार्यात 51 जणांना नदीतून बाहेर काढले होते. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला असून आठ जणांची प्रकृती गंभीर आहे.
मंत्री गिरीश महाजन तात्काळ पुण्यात दाखल –
पुणे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळल्याच्या घटनेची माहिती मिळताच नाशिकवरून मुंबईकडे जाणारे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे तात्काळ कल्याणवरून पुण्याकडे रवाना झाले. काल सायंकाळी ते पुण्यात पोहचले. यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच घटनेत गंभीर जखमी झालेल्या रूग्णांची पवना रुग्णालयात जाऊन मंत्री महाजन यांनी भेट घेतली.
मंत्री महाजन काय म्हणाले? –
मंत्री गिरीश महाजन माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, मला या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पुण्याकडे रवाना झालो. खरंतर, 1992 पासूनचा हा पुल होता. आज सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी त्या पुलावर होती. त्या पुलाची क्षमता नसताना मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या पुलावर उभे राहिले आणि यामुळे ही अतिशय दुर्दवी घटना घडली. घटना घडल्यानंतर स्थानिक लोकांनी अनेकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रशासनाकडून देखील तात्काळ मदतकार्य राबविण्यात आले.
मृताच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर –
कार्याचा आढावा घेतला. इंद्रायणी नदीवरील पुलाच्या दुर्घटनेत मृत्युमुखी झालेल्या कुटुंबीयांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. तर, जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासनातर्फे करण्यात येणार आहे, असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी-चिंचवड शहरचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उप विभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार तसेच गट विकास अधिकारी आदी उपस्थित होते.
एनडीआरएफकडून बचावकार्य राबविण्यात येणार –
कुंडमळा पुलाचा नदीत पडलेला लोखंडी सांगाडा काल रात्री नदीपात्रातून दूर करण्यात आला होता. ही दुर्घटना घडली तेव्हा कुंडमळा पुलावर तब्बल 100 जण असल्याचे सांगितले जातं होतं. यापैकी तब्बल 50 जणांना बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान, आणखी किती लोक बेपत्ता आहेत, याची नेमकी माहिती प्रशासनाकडे नाही. त्यामुळे एनडीआरएफच्या पथकाकडून नदीपात्रात उतरुन आज बेपत्ता लोकांचा शोध घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.