लासगाव (पाचोरा), 20 ऑगस्ट: गेल्या चार-पाच वर्षांपासून समाजमंदिरात राहणाऱ्या लासगाव येथील राजू भालेराव यांच्या घरकुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. घरकुल मंजूर होऊनही बँक खात्यात निधी जमा होत नसल्याबाबत सुवर्ण खान्देश लाईव्हने १४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी संबंधित प्रशासनाला तत्काळ सूचना केल्या. त्यानंतर अवघ्या काही तासांतच राजू भालेराव यांच्या बँक खात्यात घरकुलाचा पहिला हप्ता जमा झाला आहे.
राजू भालेराव यांचे समाजमंदिरात वास्तव्य –
राजू भालेराव हे गेल्या चार-पाच वर्षांपासून लासगाव येथील समाजमंदिरात वास्तव्यास आहेत. पक्क्या घरासाठी त्यांनी ग्रामपंचायतीकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर त्यांचे रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले. मात्र, मंजुरीनंतरही प्रत्यक्ष निधी खात्यात जमा होत नसल्याने त्यांच्या पक्क्या घराचे स्वप्न रखडले होते.
यासंदर्भात १४ ऑगस्ट रोजी सुवर्ण खान्देश लाईव्हच्यावतीने स्पेशल रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला होता. घरकुल मंजूर असूनही निधी मिळत नसल्याने लाभार्थ्याला समाजमंदिरात राहावे लागत असल्याची वस्तुस्थिती या वृत्तातून मांडण्यात आली होती.
सीईओंची तत्काळ दखल –
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची सुवर्ण खान्देश लाईव्हचे विशेष प्रतिनिधी चंद्रकांत दुसाने यांनी १९ ऑगस्ट रोजी भेट घेऊन हे प्रकरण त्यांच्या निदर्शनास आणून दिले. लाभार्थ्याची परिस्थिती आणि घरकुल मंजूर होऊनही निधी मिळत नसल्याची बाब त्यांच्यासमोर मांडण्यात आली. सीईओंनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत पाचोरा पंचायत समितीला आवश्यक सूचना केल्या. त्यानंतर संबंधित यंत्रणेने कार्यवाही सुरू केली.
काही तासांतच खात्यात पैसे –
प्रशासनाच्या तात्काळ कार्यवाहीनंतर अवघ्या काही तासांत राजू भालेराव यांच्या बँक खात्यात घरकुलाचा पहिला हप्ता जमा झाला. त्यामुळे अनेक दिवसांपासून घरकुलाच्या निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या भालेराव यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
निधी खात्यात जमा झाल्यानंतर आता स्वतःच्या जागेवर घरकुलाचे बांधकाम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून समाजमंदिरात राहणाऱ्या भालेराव यांच्या कुटुंबाला अखेर पक्क्या घराची आशा निर्माण झाली असून, राजू भालेराव यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
जळगावच्या सीईओ घरकुलांच्या पूर्ततेसाठी सकारात्मक –
२०२१ बॅचच्या महाराष्ट्र कॅडरच्या आयएएस अधिकारी करिश्मा नायर यांनी १० एप्रिल २०२६ रोजी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील विविध भागांना भेटी देत विकासकामांसह घरकुल योजनांच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. तसेच अपूर्ण घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना केल्या.
ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या घरकुल योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा आणि मंजूर घरकुलांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी सीईओ नायर या सकारात्मक भूमिकेतून काम करत असल्याचे दिसून येत आहे. लासगाव येथील राजू भालेराव यांच्या प्रकरणातही त्यांनी दाखवलेली तत्परता याच सकारात्मक कार्यपद्धतीचे उदाहरण ठरले आहे.
हेही वाचा: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! इयत्ता 1 ली ते 8 वीला आता मिळणार मोफत दप्तर






