सातारा, 13 फेब्रुवारी : शिवाजी महाराज नसते तर आज भारतात कितीतरी पाकिस्तानी असते, असे वक्तव्य राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केलंय. सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा (राज्य सार्वजनिक विद्यापीठ) पहिला दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठ परिसरात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज माझे नाव काहीतरी वेगळे असते, असेही राज्यपाल म्हणाले.
जुन्या शिक्षण पद्धतीची जागा ही नवीन शिक्षण धोरणाने घेतली आहे. त्यामुळे विद्यापीठांकडून दिले जाणारे शिक्षण जागतिक मानकांनुसार असेल याची खात्री होईल, असा विश्वासही राज्यपाल यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, संस्थेचे सचिव विकास देशमुख, उपाध्यक्ष अॅड. भगीरथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
साताऱ्यात राज्यपाल राधाकृष्णन नेमकं काय म्हणाले? –
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात बोलताना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले की, जर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान योद्धा या देशात जन्माला आला नसता तर काय झाले असते? आज मी राधाकृष्णन या नावाने उभा आहे. कदाचित माझे नाव दुसरे काहीतरी असते. भारतमातेमध्ये खूप पाकिस्तान असतील. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज एक महान योद्धा होते, ज्यांनी हिंसकांविरुद्ध लढा दिला. दरम्यान, एखाद्याची महानता त्यांच्या कर्मांनी ठरवली जाते, ते ज्या जातीत जन्माला आले आहेत त्यावरून नाही हे देखील आयुष्यभर लक्षात ठेवले पाहिजे, असेही राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले. राज्यपाल पुढे बोलताना म्हणाले की, आपण इस्लामच्या विरोधात आहोत का? तर निश्चितच नाही. आता ते सर्व संपले आहे. आता आपल्याला एकत्र राहायचे आहे. परंतु, त्याचवेळी आपण इतिहास त्याच्या खऱ्या अर्थाने लक्षात ठेवला पाहिजे. यासोबतच आपल्याला सत्य जसे आहे तसे माहित असले पाहिजे. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज एकता, बंधुता आणि सामाजिक न्यायासाठी उभे राहिले. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेऊन जगले पाहिजे, असे आवाहन राज्यपालांनी केले.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत